खरेदीच्या जमीनीत काड्या करतो म्हणून नवनाथ माझीरेचा खून ; वेल्हे खून प्रकरणात ५ जणांना पोलिसांनी केली अटक …!

भोर : वेल्हे तालुक्यात ६ मार्च पाबे येथील नवनाथ उर्फ पप्पू नामदेव रेणुसे याचा धारदार चाकू व सत्तूराने वार करून पिस्तूलमधून गोळ्या झाडून वेल्हे गावातील विसावा हॉटेलमध्ये खून करण्यात आला होता. या खून प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले असून खरेदी जमिनीत काड्या व पुर्ववैमनस्यातून खून झाल्याचा उलगडा पोलिसांनी केला आहे.

या प्रकरणी पोलिसांनी आरोपी माऊली उर्फ ज्ञानेश्वर लक्ष्मण रेणूसे , आकाश कुमार शेटे (वय २४ वर्षे रा. शुक्रवार पेठ पुणे), यश उर्फ प्रथमेश विनायक चित्ते (वय २२ वर्षे, शुक्रवार पेठ, पुणे), अक्षय गणेश साळुंखे (वय २७ वर्षे), शुभम राजेश थोरात (मूळ रा. भालगुडी, ता. मुळशी, सध्या सर्वजण रा. शुक्रवार पेठ पुणे) यांना ताब्यात घेऊन अटक केल्यानंतर खूनाचा उलगडा झाला आहे.
पोलिस तपासात ज्ञानेश्वर रेणूसे यानेच हा खून केला असून नवनाथ हा रेणुसे याने खरेदी केलेल्या जमीनीच्या व्यवहारात हस्तक्षेप करीत होता व माऊली रेणुसे याचा मुलगा एक वर्षापूर्वी मयत झाला, त्याच्या मृ्त्यूस नवनाथ हाच कारणीभूत असल्याचा संशय या खूनामागे होता अशी माहिती पुढे आली आहे.

सहायक निरीक्षक नेताजी गंधारे, राहूल गावडे, हवालदार सचिन घाडगे, अजित भुजबळ, राजू मोमीन, चंद्रकांत जाधव, अमोल शेडगे, बाळासाहेब खडके, तुषार भोईटे, मंगेश भगत, अक्षय सुपे यांच्यासह वेल्हे पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक मनोज पवार, हवालदार योगेश जाधव, सहायक फौजदार सुरेश कांबळे आदींच्या पथकाने ही कामगिरी केली.