पुणे महापालिकेकडून पुन्हा उरुळी देवाची, फुरसुंगीत विकासकामे सुरू होणार; प्रादेशिक विकास योजनेला मिळणार गती..


पुणे : सध्या पुण्यातील उरुळी देवाची आणि फुरसुंगी या गावांबाबत अनेक गोष्टी समोर येत आहेत. आता महापालिका हद्दीतून उरुळी देवाची आणि फुरसुंगी गावे वगळण्यासंदर्भातील प्रारूप अधिसूचना राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने जानेवारी महिन्यात काढली होती.

या दोन्ही गावांची मिळून नगरपरिषद करण्याचे प्रस्तावित होते. त्यासंदर्भात राज्य शासनाकडून महापालिकेला अभिप्राय विचारण्यात आला होता. याबाबत वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत.

गावे वगळण्यास हरकत नसल्याचा अभिप्राय महापालिकेने दिल्यानंतर त्याबाबतच हरकती-सूचना मागविण्यात आल्या होत्या. त्याचा अहवाल नगरविकास विभागाला पाठविण्यात आला आहे.

गावे वगळण्याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर महापालिका प्रशासनाकडून या दोन्ही गावांतील विकासकामे थांबविण्यात आली होती. यामुळे याबाबत मोठा खोळंबा झाला होता. गावांचा विकास खुंटल्याची तक्रार सातत्याने होत असल्याने या गावांमध्ये विकासकामे करण्यासंदर्भातील चर्चा सुरू झाली होती.

त्यातच महापालिका हद्दीत गावे वगळण्यात आलेली नाहीत आणि कायदेशीर बाबी तपासूनच गावे वगळण्यासंदर्भातील निर्णय घेतला जाईल, अशी हमी राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने दिल्याने विकासकामे करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

प्रादेशिक विकास योजनेलाही गती..

फुरसुंगी आणि उरुळी देवाची या दोन गावांत मिळकतकर आकारणी चुकीच्या पद्धतीने झाली असल्याने लाखो रुपयांची थकबाकी निर्माण झाली आहे. त्या विरोधात नागरिकांनी तक्रारी केल्या. शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार विजय शिवतारे यांनी गावे वगळण्याबाबत आग्रही भूमिका घेतली होती.

त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गावे वगळण्याचा आणि या दोन्ही गावांची मिळून नगर परिषद करण्याचा निर्णय जाहीर केला होता. मात्र आता या गावांमध्ये रस्ते, सांडपाणी वाहिन्या तसेच अन्य पायाभूत सुविधांची कामे केली जाणार आहेत. रखडलेल्या प्रादेशिक विकास योजनेलाही गती मिळण्याची शक्यता आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!