आजही नागरिकांना अलर्ट जारी! महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा इशारा, जाणून घ्या..

पुणे : सध्या राज्यात अवकाळी पावसाचा जोर कायम असून अनेक भागांत ढगाळ वातावरणासह जोरदार सरी कोसळत आहेत. अनेक ठिकाणी कमी वेळेत जास्त पाऊस पडल्याने मोठी तारांबळ उडाली. पुण्यात रस्त्यावर पाणी साचले होते. या पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान होत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत.

आता भारतीय हवामान विभागाने पुढील काही दिवस राज्यात पावसाची स्थिती कायम राहण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आज मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
अमरावती, अहिल्यानगर, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, यवतमाळ, अकोला, जालना, परभणी, बीड, धाराशिव, लातूर, हिंगोली, नांदेड, वाशिम आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.मराठवाड्यातील अनेक भागांत सकाळपासूनच ढगाळ वातावरण दिसून येत आहे. काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या असून दुपारनंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट होण्याचाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. हवामान विभागाने या भागांसाठी येलो अलर्ट जारी केला असून पुढील 24 तासात पावसाची तीव्रता वाढू शकते, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
नांदेड शहरासह अर्धापूर आणि मुदखेड तालुक्यात पावसाच्या सरी कोसळल्या. सतत पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांना मोठा फटका बसत आहे. अनेक ठिकाणी काढणीला आलेली पिके पावसामुळे खराब झाली आहेत. नांदेड जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशीही अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी चिंतेत आहेत.