महाराष्ट्रावर ‘अवकाळी’च संकट कायम, वादळी वाऱ्यासह पाऊस झोडपून काढणार; ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट?

पुणे : राज्यात गेल्या दोन ते तीन दिवसापासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे.आज देखील दक्षिण मराठवाडा आणि पूर्व विदर्भात जोरदार वाऱ्यांसह वादळी पावसाची शक्यता असल्याने हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे. तसेच पुढील 4 दिवस राज्यात पावसाळी वातावरण कायम राहणार आहे.या वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

आज मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड आणि विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांत राज्यात ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहणारे वारे, मेघगर्जना, विजांसह वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज असल्याने हवामान विभागाकडून यलो अलर्ट देण्यात आला आहे.राज्यातील या अवकाळी पावसामुळे हवामानात मोठा बदल झाला असून मराठवाडा आणि विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, शुक्रवारी यवतमाळ येथे राज्यातील उच्चांकी 38 अंश तापमान नोंदले गेले आहे. जळगाव आणि अकोला येथे 37 अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली आहे. महाबळेश्वर आणि मालेगाव येथे राज्यातील नीचांकी 15 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले आहे.

राज्यात अद्याप अवकाळी पावसाच सावट कायम असून आज देखील अनेक ठिकाणी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र,मराठवाडा आणि विदर्भात वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.