उद्धव ठाकरेंचा मोठा राजकीय डाव! राजकारणात मोठ्या हालचाली, नेमकं काय घडतंय?

मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा विधान परिषदेतील सदस्यत्वाचा कार्यकाळ १३ मे २०२६ रोजी संपत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे पुन्हा विधान परिषदेवर जाणार का, याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

विशेष म्हणजे यावर प्रतिक्रियादेखील येऊ लागल्या आहेत. उद्धव ठाकरे यांच्यासह विधान परिषदेतील ९ आमदारांचा कार्यकाळ हा लवकरच संपणार आहे. त्यामुळे विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीकडे पुरेसं संख्याबळ नसल्याने त्यांची कोंडी होणार असल्याचं चित्र आहे.
संख्याबळाच्या कमतरतेमुळे उद्धव ठाकरे यांच्यासाठी विधान परिषदेची निवडणूक जिंकणं हे मोठं आव्हान असणार आहे. विशेष म्हणजे संख्याबळ पाहता विधान परिषदेच्या ९ जागांपैकी महाविकास आघाडीला केवळ एकच जागेवर यश मिळू शकतं.

ती एक व्यक्ती उद्धव ठाकरे असतील का? ते पाहणं आता महत्त्वाचं आहे. उद्धव ठाकरे हे स्वत: विधान परिषदेवर जाणार की दुसऱ्या कुणाला संधी देणार? ते पाहणं देखील महत्त्वाचं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी याबाबत महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.
विधान परिषदेवर जाण्यासाठी आम्ही उद्धव ठाकरे यांना विनंती केल्याचं संजय राऊत म्हणाले आहेत. उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेत जावं, अशी आमची सर्वांची इच्छा आहे, असंदेखील संजय राऊत म्हणाले. तसेच विधान परिषद आणि राज्यसभा निवडणुकीत मविआला एकमेकांना मदत करावी लागेल, अशी भूमिका संजय राऊत यांनी मांडली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी देखील याबाबतच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली. उद्धव ठाकरे यांना विधीमंडळात जाण्यासाठी आता मध्ये कुठली निवडणूक नाही. विधीमंडळात जायचंच असेल तर विधानसभेचं मागचं दार ज्याला म्हणतात त्या विधान परिषद निवडणुकीचा पर्याय त्यांना आहे. मला वाटतं ते त्या मार्गाने परत विधान परिषदेवर जातील. संख्याबळाचं गणितं पााहता इतर पक्षांनी त्यांना पाठिंबा दिला तर ते विधान परिषदेत जातील, अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी दिली.