पानशेतमध्ये दगडाने ठेचून आदिवासी तरुणाचा खून, पाच हल्लेखोरांची लाथाबुक्क्यांनी मारहाण, घटनेने खळबळ..

पुणे : पुण्यातील पानशेत येथील दाट लोकवस्तीच्या रस्त्यावर आदिवासी तरुणाचा निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लाथा बुक्यांनी मारहाण आणि दगडाने ठेचून आदिवासी कातकरी समाजाच्या युवकाचा निर्घृण खून करण्यात आला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
रोहिदास काळुराम काटकर ( वय २४, रा.कादवे, ता. राजगड) असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेने आदिवासी कातकरी समाजावर शोककळा पसरली आहे. या प्रकरणी वेल्हे पोलिसांनी पाच अज्ञात हल्लेखोरां विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. अद्याप खूनाचे कारण स्पष्ट झाले नाही.
मिळालेल्या माहिती नुसार, हा प्रकार काल रविवारी (ता. १५ ) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पानशेत येथे नंदाबाई कुंभार यांच्या हॉटेल समोर घडला. मयत रोहिदास काळुराम काटकर आणि मोसे (ता. राजगड) येथील विजय पांडुरंग जाधव हे दोघे जण पानशेत येथे नंदाबाई कुंभार यांच्या हाँटेल समोर उभे होते .
याचवेळी मोटरसायकलवरुन आलेले २० ते २५ वयोगटातील पाच अज्ञात हल्लेखोरांनी त्यांना अचानक लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. मयत रोहिदास काटकर याच्यावर एकाच वेळी सर्व हल्लेखोरांनी लाथा बुक्क्यांनी जोरदार प्रहार केले.
त्यावेळी एका हल्लेखोराने रस्त्यावर पडलेल्या मोठा दगडाने रोहिदास याच्या छातीवर जोरदार प्रहार केला, त्यात रोहिदास याचा जागीच मृत्यू झाला. या हल्ल्यात विजय जाधव हा पण जखमी झाला.
दरम्यान, या प्रकरणी मयत रोहिदास काटकर याचा भाऊ अविनाश काटकर याने वेल्हे पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. वेल्हे पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नितीन खामगंळ यांच्या देखरेखीखाली पोलीस उपनिरीक्षक अमित देशमुख तपास करत आहेत. पानशेत पोलीस चौकीचे पोलिस अंमलदार आकाश पाटील, युवराज सोमवंशी, ज्ञानदीप धिवार आदी पोलिस जवानांसह वेल्हे व ग्रामीण पोलीस फरार हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.