पुणेकरांनो लक्ष द्या! मराठा मोर्चामुळे वाहतुकीत बदल, बाहेर पडण्यापूर्वी जाणून घ्या पर्यायी मार्ग…

पुणे : मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचा २७ ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने निघालेला मोर्चा आता अंतिम टप्प्यात दाखल झाला आहे.

गुरुवारी पहाटे पारनेर येथे त्यांचे भव्य स्वागत झाले असून, शिवनेरीवर मुक्कामानंतर मोर्चा पुढे सरकला आहे. हजारो मराठा बांधवांसह जरांगे पाटील हे थेट मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी ठाम आहेत.
पुण्यात वाहतुकीत बदल..
मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी आणि वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी वाहतुकीचे मार्ग बदलण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी आदेश जारी केले आहेत.

नगर-कल्याण मार्गावरील वाहतूक जांबुत फाटा – बोर – बेल्हे – अळकुटी – पारनेर – अहिल्यानगरमार्गे वळवण्यात आली आहे.
नारायणगावकडून जुन्नरकडे जाणारी वाहतूक ओझर फाटा – कारखाना फाटा – शिरोली बुद्रुक मार्गे नेण्यात आली आहे.
२७ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता अंतरवालीहून मोर्चाला सुरुवात झाली. पहिल्या दिवशी पैठण, शेवगाव, कल्याण फाटा, आळे फाटा मार्गे जुन्नर येथे मुक्काम झाला. २८ ऑगस्ट रोजी मोर्चा खेड, चाकण, लोणावळा, वाशी आणि चेंबूर मार्गे रात्री आझाद मैदानात पोहोचणार आहे. त्यानंतर २९ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता आंदोलन सुरू होईल.
मुंबई पोलिसांच्या अटी..
आझाद मैदानातील आंदोलनासाठी मुंबई पोलिसांनी काही कडक अटी घातल्या आहेत.
आंदोलनासाठी फक्त २९ ऑगस्ट रोजी सकाळी ९ ते सायं ६ वाजेपर्यंतच परवानगी असेल.
त्यानंतर आंदोलकांना मैदानात थांबता येणार नाही.
आझाद मैदानात जास्तीत जास्त ५,००० आंदोलकांनाच प्रवेश दिला जाणार आहे