टोरेस कंपनीचा गुंतवणूकदारांना गंडा! ५०० कोटी घेऊन मालक फरार, ३ लाख लोकांना रस्त्यावर यायची वेळ, नेमकं काय घडलं?

मुंबई : टोरेस लिमिटेड या कंपनीने पैसे दुप्पट, तिप्पट करून देण्याचे आमिष दाखवत चिटफंड कंपनीने लाखो गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा फसवल्याचे समोर आले आहे. यामुळे गुंतवणूकदारांच्यात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत तपास सुरू आहे. या चिटफंड कंपनीच्या या आमिषाला मुंबईतील तब्बल तीन लाख लोक बळी पडले आहेत.

या कंपनीने माफको मार्केटच्या समोर त्यांनी कार्यालय उभे केले होते. त्यांनी गुंतवणूकदारांना पाच वर्षांत दुप्पट, सात वर्षांत तीनपट आणि १० वर्षांमध्ये चौपट रक्कम देण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच या लोकांना प्रत्येक महिन्याला विशिष्ट व्याजही गुंतवणूकदारांच्या खात्यात जमा होईल, असेही सांगितले होते.
यामुळे लाखो गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केली. हा प्रकार समोर आल्यानंतर मीरा-भाईंदर पोलिसांनी याबाबत गुंतवणूकदारांकडून तक्रारी स्वीकारण्यास सुरुवात केली. पोलिसांनी चौकशी केली असता मोठ्या प्रमाणावर फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. आता कंपनीच्या मालक आणि संचालकांची माहिती गोळा करण्यात येत आहे.

या घटनेने अनेकजण उध्वस्त झाले असून पैसे मिळणार की नाही याचे टेन्शन आलं आहे. टोरेस कंपनीचा मालक गुंतवणूकदारांचे ५०० कोटी रुपये घेऊन परदेशात पळून गेल्याचा आरोप संतप्त गुंतवणूकदार करत आहेत. या कंपनीचा मालक सुर्वे नामक व्यक्ती होती, अशी माहिती गुंतवणूकदारांकडून मिळत आहे.
दादरला या कंपनीचे मुख्य ऑफिस आहे. याठिकाणी गुंतवणूकदारांची गर्दी होऊ लागल्यानंतर या कार्यालयासमोर पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. तसेच दादर येथील मुख्य कार्यालय अचानक बंद झाले. शिवाय मीरा-भाईंदरमधील शोरूमदेखील बंद करण्यात आले आहे. यामुळे गुंतवणूकदार घाबरले आहेत.