अजित पवारांच्या निधनानं महाराष्ट्रात तीन दिवसाचा दुखवटा ; ‘एक दमदार आणि दिलदार मित्र हरपला’, मुख्यमंत्री फडणवीसांची भावुक प्रतिक्रिया

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानं संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. कधीही भरून न येणारी महाराष्ट्राची हानी झाली आहे. राज्याच्या कानाकोपऱ्याची माहिती असणारा नेता गमावल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं आहे.

अजित पवारांच्या निधनावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अजित पवारांसारखे नेतृत्व तयार व्हायला अनेक वर्ष लागतात. ज्यावेळी महाराष्ट्राच्या विकासात ते महत्त्वपूर्ण योगदान देत होते, त्या काळात त्यांचे निघून जाणे हे अविश्वसनीय आणि मनाला चटका लावणारे आहे. माझ्यासाठी दमदार, दिलदार मित्र सोडून गेला आहे. खरंतर अजित पवार महाराष्ट्रातील एक लोकनेते होते, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याची माहिती असलेला,महाराष्ट्राच्या प्रश्नांची जाण असलेला नेता गमावला अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी भावना व्यक्त केल्या.
. राज्यात आज शासकीय सुट्टी आणि तीन दिवसाचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.पुढच्या सर्व बाबींची कल्पना लवकरच देण्यात येईल. अजित पवारांचे जाणे हे कधीही भरून न येणारे हे नुकसान आहे. महाराष्ट्रातून असे लोकनेते गेल्यानंतर जी पोकळी तयार होते ती भरून काढणे अतिशय कठीण आहे. या घटनेवर विश्वास ठेवायला मन तयार नाही असं सांगताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गहिवरले.

अजित पवार यांच्या बद्दल जनसामान्यांमध्ये प्रचंड आस्था होती. अतिशय संघर्षशील असं नेतृत्व होते. सर्व परिस्थितीत न डगमगता पुढे जाणारे व्यक्तिमत्व होते. महाराष्ट्रासाठी आजचा दिवस अत्यंत कठीण दिवस आहे अशी शोक भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.