टीम इंडियाचा ‘हा’ स्टार खेळाडू ईडीच्या रडारवर, तब्बल ८ तास चौकशी, नेमकं प्रकरण काय?

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून क्रिकेटपटू आणि बॉलिवूड कलाकार सक्तवसुली संचालनालयाच्या रडारवर आहेत. काही दिवसांपासून हरभजन सिंग आणि सुरैश रैना यांना ईडीने नोटीस पाठवली होती.

अशातच आता माजी स्टार सलामीवीर फलंदाज शिखर धवन याच्या अडचणी वाढल्या आहेत. एका प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने शिखर धवनला नोटीस पाठवली आहे. त्यामुळे आता शिखर धवनच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
गुरुवारी (ता.४) तो ऑनलाईन बेटिंग अॅप च्या प्रमोशन प्रकरणात ईडीच्या चौकशीला सामोरा गेला. सकाळी ११ वाजता दिल्लीतील ईडी मुख्यालयात पोहोचलेल्या धवनची चौकशी संध्याकाळी ७ वाजेपर्यंत म्हणजेच तब्बल ८ तास करण्यात आली आहे.

शिखर धवनने २०१० मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय संघातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानंतर २०११ मध्ये श्रीलंकेविरुद्ध टी-२० आणि २०१३ मध्ये कसोटी संघात त्याचा समावेश झाला. धवनने ३४ कसोट्यांत २३१५ धावा, १६७ एकदिवसीय सामन्यांत ७४३६ धावा आणि ६८ टी-२० सामन्यांत १७५९ धावा केल्या.
तसेच २०२२ मध्ये त्याने बांगलादेशविरुद्ध आपला शेवटचा एकदिवसीय सामना खेळला. त्यानंतर भारतीय संघात त्याला संधी मिळाली नाही आणि अखेर २०२४ मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.
आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून धवन सक्रिय आहे. २००८ मध्ये त्याने दिल्ली संघाकडून पहिला सामना खेळला. २०२४ हंगामात तो पंजाब किंग्जकडून खेळला, पण दुखापतीमुळे फारसे सामने खेळता आले नाहीत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतरही आयपीएल खेळत राहण्याची शक्यता त्याने कायम ठेवली आहे. दरम्यान, २०१२ मध्ये शिखर धवनने आयेशा मुखर्जीशी लग्न केले.
आयेशा ही त्याच्यापेक्षा १० वर्षांनी मोठी होती आणि तिच्या मागील लग्नातून दोन मुले होती. २०१४ मध्ये शिखर आणि आयेशाला जोरावर नावाचा मुलगा झाला. मात्र, त्यांच्या नात्यात काही वर्षांत तणाव निर्माण झाला. २०२१ मध्ये दोघे वेगळे झाले आणि ४ ऑक्टोबर २०२३ रोजी दिल्ली कुटुंब न्यायालयाने त्यांचा घटस्फोट मंजूर केला. न्यायालयाने धवनच्या मानसिक क्रूरतेच्या आरोपांना मान्यता दिली.