शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! ‘या’ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी मिळणार ‘इतकी’ मदत, जाणून घ्या…

मुंबई : राज्य शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देणारा महत्त्वाचा निर्णय घेतला असून, त्याचा प्रत्यक्ष लाभ आता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ लागला आहे. अतिवृष्टीमुळे कापूस, सोयाबीन, मका, भुईमूग यांसारख्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते.

खरीप हंगाम वाया गेल्यानंतर रब्बी हंगामासाठी भांडवल उभे करणे अनेक शेतकऱ्यांना कठीण झाले होते. त्यामुळे शेती पुन्हा उभारी घेण्यासाठी शासनाकडून आर्थिक मदतीची आवश्यकता होती, आणि त्यानुसार ही मदत योजना अमलात आणण्यात आली आहे.


राज्य शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तीन हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेत प्रतिहेक्टर १० हजार रुपये आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय घेतला आहे. यामागचा उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी आवश्यक भांडवल उपलब्ध करून देणे आणि शेती पुन्हा सुरळीत करण्यासाठी मदत करणे हा आहे.
तसेच या योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यासाठी एकूण २७० कोटी ९२ लाख ६४ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये जिल्ह्यातील ३ लाख ५५ हजार ४८७ शेतकऱ्यांचा समावेश आहे.
दरम्यान, १५ जानेवारीअखेरपर्यंत २ लाख ७१ हजार २७ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट १८७ कोटी ४३ लाख ८ हजार ७४३ रुपये वर्ग करण्यात आले आहेत. म्हणजेच सुमारे ७० टक्के शेतकऱ्यांना आतापर्यंत मदतीचा लाभ मिळाला असून, उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यातही लवकरच रक्कम जमा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
