अजित पवार पालकमंत्री जबाबदारीने भाजप मंडळींची जिल्ह्यात होणार अडचण! सत्तेचे बाहुले होणार असल्याची सुरु झाली चर्चा..!!


जयदीप जाधव

उरुळीकांचन : राज्याच्या सत्तेच्या पॅटर्नमध्ये विरोध पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला भाजप व शिंदे गटाने सामावून घेतल्याने पुणे जिल्ह्यात आता पालकमंत्रीपदाची खुर्ची बदलणार असल्याचे निश्चित झाले आहे. जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची धुरा पुन्हा आता अजित पवार यांच्यावर येणार असल्याने त्यांच्या पालकमंत्रीपदाच्या शक्यतेने जिल्ह्यात भाजप लोकप्रतिनिधी,पदाधिकारी तसेच कार्यकर्ते यांना पालकमंत्र्यांच्या अधिपत्याखाली कारभार पहावा लागणार आहे.

त्यामुळे आता भाजप लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते यांना त्यांच्या दरबारात योग्य न्याय मिळेल का ? म्हणून हे सर्व जण चिंताग्रस्त झाले असून पालकमंत्री म्हणून अजित पवार यांची पायरी चढणे आता सत्ताधारी भाजपच्या मंडळींसाठी मोठी कसरत ठरणार आहे.

राज्यात महाविकास आघाडीच्या प्रयोगानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेत वाटेकरी करण्याचा निर्णय भाजप व शिंदे गटाने घेतला आहे. महाविकास आघाडी च्या प्रयोगानंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा हा वेगळा सत्तेचा पॅटर्न सत्तेची समीकरणे बिघडवू शकतो काय अशा चर्चांना भाजपने उतू आणण्यास सुरुवात केली आहे.

महाविकास आघाडीच्या काळात सत्तेत असणाऱ्या काँग्रेस आणि शिवसेना या पक्षांनी निधीवाटपासह राजकीय रसद मित्र पक्षांना दिली जात नसल्याचा वारंवार आरोप करण्यात येत होता. या विवादावरुन सत्तेतून बाहेर पडण्यापर्यंत निर्णय घेण्यात आले. आता हाच सत्तेचा प्रयोग पुणे जिल्ह्यात भाजपच्या वाटेला येतो काय , म्हणून भाजप लोकप्रतिनिधी , पदाधिकारी व कार्यकर्ते यांना वाटू लागले आहे.

राज्यात सत्तेचे दुसऱ्या क्रमांकाचे पद राष्ट्रवादी काँग्रेसला देऊ केल्याने साहजिकच पुणे जिल्ह्यात पालकमंत्रीपदी अजित पवार यांची वर्णी जगजाहीर आहे. जिल्ह्यातील महत्त्वाचे प्रकल्प असलेले मेट्रो, रिंग रोड, विमानतळ आदी प्रगतीपथावर आहेत. त्यामुळे या प्रकल्पांना गती देण्यासाठी अजित पवार यांची कृती कामी येणार आहे.

त्यासाठी अजित पवार यांच्याकडे जिल्ह्याची जबाबदारी आवश्यक आहे. अशावेळी अजित पवार यांच्याशी समन्वय साधून जिल्ह्यातील विकास निधीसह मह्त्वाची कामे ही भाजप लोकप्रतिनिधी ,पदाधिकारी व कार्यकर्ते यांना समन्वय साधून करावी लागणार आहे. त्यासाठी भाजप मंडळींना इच्छा नसूनही त्यांची पायरी चढावी लागणार आहे.

शिरुर-हवेलीत अनेकांची गोची ?

शिरुर-हवेली मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये स्थानिक नेतृत्वाच्या कार्यपद्धतीवर नाराज होऊन अनेक जणांनी राष्ट्रवादीशी  फारकत घेतली आहे. त्यापैकी मागील काळात अनेकांचे प्रवेश झाले आहेत.

तर काहींचा आगामी विधानसभेच्या तोंडावर पक्ष प्रवेश होणार होता. मात्र आता सत्तेची सूत्रे बदलल्याने या मंडळीची विरोधाची धार गळून पडणार आहे. तसेच भाजपच्या मंडळींचा सत्तेचा वाटा घटल्याने राष्ट्रवादीशी मैत्री करावी लागणार आहे. त्यामुळे सत्तेत असूनही सत्तेचे बाहुले होण्याची चिंता भाजपच्या मंडळींना लागली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!