महसूल विभागाचा कार्यभार लोकाभिमुख व पारदर्शक असावा – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे महसूल विभागाची पुण्यात दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन

पुणे : महसूल विभाग हा शासनाचा चेहरा असून पारदर्शक व गतिमान कामकाजा सोबतच नवतंत्रज्ञानाचा वापर करून, महसूल विभाग अधिक सक्षम करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले महसूल क्षेत्रिय अधिकाऱ्यांच्या दोन दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
मुख्यमंत्र्यांनी महसूल विभागाच्या शंभर दिवस कृती कार्यक्रमाच्या अनुषंगाने दिलेल्या निर्देशानुसार येथील हॉटेल ऑर्चिड येथे दोन दिवसीय महसूल क्षेत्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार, पुणे विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, छत्रपती संभाजी नगर विभागीय आयुक्त दिलीप गावडे, नागपूर विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, कोकण विभागीय आयुक्त विजय सूर्यवंशी, अमरावती विभागीय आयुक्त श्वेता सिंगल, मुद्रांक नोंदणी महानिरीक्षक रवींद्र बिनवडे, जमाबंदी आयुक्त व संचालक भूमी अभिलेख डॉ. सुहास दिवसे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
महसूलमंत्री बावनकुळे म्हणाले, महसूल विभागाने लोकाभिमुख व पारदर्शक काम करताना अधिकाऱ्यांनी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यावर भर द्यावा, ए आय (कृत्रिम बुध्दीमत्ता) सारख्या या नवमाध्यमांचा वापर करुन नाविन्यपूर्ण उपक्रम राबवावेत. या कामात आपला सहभाग अधिक असला पाहिजे, समाजाप्रती आपले काही देणे असून आपले कर्तव्य समजून प्रत्येकाने काम करावे, इतर राज्यात झालेल्या नाविन्यपूर्ण कामाप्रमाणे आपल्या राज्यात सुद्धा नवीन संकल्पना राबवून कामे व्हावीत अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. आय. ए. एस. अधिकाऱ्यांकडे खूप मोठा अनुभव असून त्या अनुभवाचा उपयोग विभागाला होण्याच्या दृष्टीने, त्यांनी सहभाग नोंदवावा, अधिकाऱ्यांच्या अभ्यासातून जर त्यांना काही नवीन बदल सुचवायचे असतील तर त्यावर शासन निश्चितच विचार करेल, तलाठी पासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत, सर्वांच्या सूचना ऐकून घेऊन विभागात गतिमान काम होण्याच्यादृष्टीने शासन निश्चितच प्रयत्न करेल.
विभागातील विविध कामे करताना नियमात काम असेल तरच कामे करावीत, जर काम नियमात नसेल तर संबंधितांना लेखी कळवावे. नियमबाह्य कामे होता कामा नये याची दक्षता घ्यावी. या कार्यशाळे निमित्त प्रत्येक जिल्ह्याने शून्य हेरिंग (सुनावणी) संकल्प राबवून. सुनावणीचे प्रकरणे तात्काळ निकाली काढावीत. माध्यमांमध्ये चुकीच्या बातम्या येत असतील तर त्याचे तात्काळ खंडन करुन त्याबाबतची वस्तुस्थिती माध्यमांना कळवावी. आपण केलेल्या चांगल्या कामांची माहिती माध्यमांना द्यावी, मीडियाच्या माध्यमातून चांगली कामे जनतेपर्यंत पोहोचून शासनाची प्रतिमा अधिक उजळ होण्यासाठी प्रयत्न करावे. आपल्याला तलाठी पासून ते उच्च अधिकारी पर्यंत एक परिवार म्हणून काम करायचे असून, लोकांच्या अडचणी समजून घेऊन अडचणींचे तात्काळ निराकरण केले जावे. चुकीची कामे करणाऱ्यांना अजिबात पाठीशी घातल जाणार नाही, सर्वांनी लोकहिताची चांगले कामे करावीत, चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचे कौतुक करून त्यांच्या सत्कार करण्यात येईल.त्यासाठी मी महसूल विभागाचा प्रमुख म्हणून मी नेहमी आपल्या पाठीशी उभा आहे. असा विश्वास त्यांनी यावेळी दिला.