राज्याला मुसळधार पावसाचा तडाखा! पुणे जिल्ह्यात अवकाळी पावसाने घेतला पहिला बळी, दौंड येथे ७० वर्षीय वृध्द महिलेचा भिंत अंगावर पडून मृत्यू..

दौंड : मुंबईसह राज्यातील अनेक भागांत मुसळधार पाऊस सुरू आहे. तसेच पुढील तीन दिवसांत ही राज्यात मुसळधार पाऊस पडणार आहे. यामुळे राज्य सरकारच्या आपत्ती विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. महाराष्ट्राला पावसानं झोडपून काढलं आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील बारामती दौंड, इंदापूर, माळशिरस, कान्हेरी, पंढरपूर या भागात सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. राज्यातील पावसाचा दौंड शहरात पहिला बळी गेला आहे. ही माहिती दौंड चे तहसीलदार अरुण शेलार यांनी दिली.
ताराबाई विश्वचंद आहेर (वय.७५) असे या मृत वृद्ध महिलेचे नाव आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, दौंड शहरातील एका जुन्या बांधकामाची भिंत पावसामुळे कोसळली होती. यामध्ये ताराबाई आहेर या दुकानात उभ्या असताना त्यांच्या अंगावर ही भिंत पडली. या घटनेमध्ये त्या जखमी झाल्या होत्या जखमी अवस्थेमध्ये त्यांना शहरातील एका खासगी रुग्णालयामध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात आले होते.
सोमवारी ( ता.२६) उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. ही इमारत शहरातील शिवाजी चौक येथील असून पूर्ण जीर्ण झालेली आहे. ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या ठिकाणी काही वेळापूर्वी शासकीय पंचनामे करता कर्मचारी गेले होते.
दरम्यान, शहरात अनेक ठिकाणी अशा जीर्ण झालेल्या इमारती असून त्या सुद्धा कोसळण्याचे शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी अशा जीर्ण झालेल्या इमारतीमध्ये राहू नये असे आवाहन तहसीलदार शेलार यांनी केले आहे.