जरांगे पाटलांवरील आक्षेपार्ह पोस्टने वातावरण तापलं, दोन गटांमध्ये बाचाबाची, नेमकं काय घडलं?

मुंबई : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या विषयी आक्षेपार्ह व्हिडीओ करून तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला होता. मनोज जरांगे यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्टमुळे हिंगोली जिल्ह्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले.

वसमत तालुक्यातील भेंडेगाव येथे दोन गट आमने-सामने आले. एका व्यक्तीने जरांगे पाटील यांच्यावर आक्षेपार्ह व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला होता. या व्हिडिओबद्दल जाब विचारण्यासाठी जरांगे समर्थक गावात गेले असता बाचाबाची झाली आणि तणाव वाढला.
या प्रकरणी करुंदा पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तणाव वाढू नये म्हणून पोलिसांनी तत्काळ गावात शांतता प्रस्थापित केली. या घटनेनंतर जरांगे समर्थक मोठ्या संख्येने पोलीस ठाण्यात जमा झाले आणि कठोर कारवाईची मागणी केली.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच हिंगोलीचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी करुंदा पोलीस ठाण्यात धाव घेतली. जरांगे समर्थकांची मागणी मान्य करत पोलिसांनी गुन्हा नोंदवला. त्यामुळे गावात शांतता प्रस्थापित करण्यात यश आले आहे.
याच पार्श्वभूमीवर, नुकत्याच मुंबई उच्च न्यायालयाने हैदराबाद गॅझेटच्या जीआरविरोधातील जनहित याचिका फेटाळून लावली, ज्यामुळे मराठा समाजाला मोठा दिलासा मिळाला आहे. हीच मागणी घेऊन मनोज जरांगे पाटील काही दिवसांपूर्वी गणेशोत्सवाच्या काळात मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषणावर बसले होते.