जोडप्याने दोन महिन्यांपूर्वी आळंदीत प्रेमविवाह! मावस भाऊ संतापानं झाला लाल अन्….,शिरूर येथे घडली अत्यंत धक्कादायक घटना

पुणे : पुण्यात शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी गावातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रेमविवाह केल्याच्या रागातून एका तरुणावर थेट कोयत्याने जीवघेणा हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे.

या हल्ल्यात २ वर्षीय दत्तात्रय वाघ हा तरुण गंभीर जखमी झाला असून, दोघा हल्लेखोरांना गावकऱ्यांनी पकडून पोलिसांच्या हवाली केलं आहे. शारुख शेख (वय.२६) आणि प्रशांत साठे (वय.१९) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर मुख्य आरोपी जीवन गायकवाड फरार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दत्तात्रय वाघ याने दोन महिन्यांपूर्वी आळंदीत स्नेहा हिच्याशी प्रेमविवाह केला होता. मात्र, मुलीच्या कुटुंबीयांना हा विवाह मान्य नव्हता. त्यामुळे ते सतत दत्तात्रयला धमक्या देत होते. यासंदर्भात आधीही पोलीस तक्रारी दाखल झाल्या होत्या. अखेर रागाच्या भरात हे प्रकरण थेट जीवघेण्या हल्ल्यापर्यंत पोहोचले.

दत्तात्रय वाघ टाकळीहाजी येथे पत्नी स्नेहासोबत राहत असून तिथेच त्याचे सलूनचे दुकान आहे. आज सकाळी तो गिऱ्हाईकाचे केस कापत असताना अचानक शारुख शेख प्रशांत साठे आणि मुख्य आरोपी जीवन गायकवाड हे तिघे दुकानात घुसले. त्यांनी दुकानाच्या काचा फोडल्या, तोडफोड केली आणि कोयत्याने वार करून दत्तात्रयला गंभीर जखमी केले.
हल्ला करून आरोपी दुचाकीवरून पळून जाऊ लागले, मात्र गावकऱ्यांनी त्यांचा पाठलाग करत शारुख आणि प्रशांतला पकडून पोलिसांच्या हवाली केले. मुख्य आरोपी जीवन गायकवाड सध्या फरार असून त्याचा शोध सुरु आहे.