खरातची माहिती दिवाळीमध्येच मुख्यमंत्र्यांकडे होती; तर सहा महिने झोपा काढल्या काय?हर्षवर्धन सपकाळांनी डिवचलं

पुणे : नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाचे पडसाद आता विधानभवनात उमटत असून यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खंडाजगी होत आहे. यावरून आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डिवचलं आहे.

हर्षवर्धन सपकाळ यांनी असं म्हटलं आहे की,दिवाळीच्या आसपास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाची माहिती मिळाली होती. ऑक्टोबर, नोव्हेंबरपासूनच खरातचे गैरव्यवहार चव्हाट्यावर आले, गृहविभाग पुरावेही गोळा करत होते, मग मुख्यमंत्री सहा महिने झोपा काढत होते का?, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले,अशोक खरातचे प्रकरण अंधश्रद्धेतून निर्माण झाले आहे, यातून आपण धडा घेतला पाहिजे, वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगला पाहिजे. अंधश्रद्धा कोण वाढवत आहे, धर्माधर्मात, जाती जातीत वाद कोण निर्माण करत आहे. द्वेष कोण निर्माण करत आहे, हे सर्वांना माहित आहे. यातूनच खरात सारख्या विकृती जन्माला येतात याची दखल घेतली पाहिजे. 2024 पासून देवेंद्र फडणवीस राज्याचे गृहमंत्री आहेत त्यांच्याच काळात अशोक खरात सारख्या विकृतीने महाराष्ट्रात थैमान घातले आहे.

दरम्यान गेल्या काही दिवसापासून खरात प्रकरणाने जी विकृत चर्चा सुरु आहे ती महाराष्ट्रासाठी चांगली नाही. एसआयटीला अधिकची कुमक द्या, टास्क फोर्स लावा आणि दोषींना गडाआड करून या खरात प्रकरणाचा शेवट करा, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.