एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाचा करिष्मा, ‘या’ नगरपरिषदेवर २१ पैकी २१ जागांवर विजय..

खेड: महाराष्ट्रात सुरू असलेल्या नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचे निकाल एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसाठी अत्यंत उत्साहवर्धक ठरत आहेत. कोकणात सिंधुदुर्गपाठोपाठ रत्नागिरी जिल्ह्यातही शिवसेनेने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.
मालवण, कणकवलीनंतर आता रत्नागिरीतील खेड नगरपरिषदेचा निकाल समोर येताच राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. गृहराज्य मंत्री योगेश कदम यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने खेड नगरपरिषदेत इतिहास घडवत सर्वच्या सर्व 21 जागांवर विजय मिळवला आहे.
2 डिसेंबर रोजी झालेल्या मतदानानंतर खेडमध्ये सत्तेचा कौल कोणाच्या बाजूने लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र मतमोजणी सुरू होताच महायुतीने एकतर्फी आघाडी घेत विरोधकांना नामोहरम केले.

निकाल जाहीर होताच खेड नगरपरिषदेत 21-0 असा ऐतिहासिक निकाल लागला आणि महाविकास आघाडीला खातेही उघडता आले नाही. हा निकाल केवळ स्थानिक राजकारणापुरता मर्यादित न राहता कोकणातील सत्तासमीकरणे बदलणारा मानला जात आहे.

खेड नगरपरिषद निवडणुकीत गृहराज्य मंत्री योगेश कदम यांनी आपली संघटनात्मक ताकद आणि नेतृत्वक्षमता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. योगेश कदम हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांचे पुत्र असून, उदय सामंत यांच्यासोबत रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेनेची मजबूत फळी त्यांनी उभी केली आहे.
या निवडणुकीत शिवसेनेचे 17 उमेदवार विजयी झाले असून भाजपचे 3 उमेदवार यशस्वी ठरले आहेत. महायुतीच्या या एकसंध विजयामुळे खेड नगरपरिषदेत निर्विवाद सत्ता प्रस्थापित झाली आहे.
या निकालानंतर माधवी भुटाला या खेड नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा म्हणून विराजमान होणार आहेत. मतदारांनी दिलेल्या स्पष्ट कौलातून विकासाभिमुख आणि स्थिर नेतृत्वावरचा विश्वास अधोरेखित झाला आहे. 21 पैकी 21 जागा जिंकण्याची कामगिरी खेडच्या राजकीय इतिहासात मैलाचा दगड ठरणारी ठरली आहे.
