बिगुल वाजणार! ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक आज होणार जाहीर…

नवी दिल्ली : पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचे बिगुल आज वाजणार आहे. भारतीय निवडणूक आयोग आज देशभरातील पाच राज्यांच्या आगामी विधानसभा निवडणुकांच्या तारखांची अधिकृत घोषणा करणार आहे.

यासाठी देशाची राजधानी दिल्लीतील विज्ञान भवन येथे आज दुपारी ठीक 4वाजता एका विशेष पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. निवडणूक कार्यक्रमाची घोषणा होताच संबंधित ठिकाणी तात्काळ आदर्श आचारसंहिता लागू होईल.
निवडणूक आयोग खालील पाच राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करेल…

1.पश्चिम बंगाल 2.मिळनाडू 3.आसाम 4. केरळ 5.पुद्दुचेरी (केंद्रशासित प्रदेश)
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू व विवेक जोशी हे निवडणुकांच्या तारखा, टप्पे आणि सुरक्षा व्यवस्थेबाबत माहिती देतील. निवडणूक आयोगाने तारखा जाहीर करताच संबंधित राज्यांमध्ये तात्काळ ‘निवडणूक आचारसंहिता’ लागू होईल.
सूत्रांच्या माहितीनुसार, यावेळी पश्चिम बंगालमध्ये 2011 नंतर प्रथमच अत्यंत कमी टप्प्यांत (बहुधा 1 किंवा 2 टप्प्यात) मतदान होऊ शकते. मागील 2021 च्या निवडणुकीत तिथे 8 टप्प्यांत मतदान झाले होते.
या राज्यांमधील सध्याच्या विधानसभेचा कार्यकाळ मे ते जून 2026 दरम्यान संपत आहे (उदा. पश्चिम बंगाल 7 मे, तामिळनाडू 10 मे). त्यामुळे सर्व निवडणूक प्रक्रिया 15 जून 2026 पूर्वी पूर्ण होणे अपेक्षित आहे.