अधिवेशनात वातावरण तापलं!लोकसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव, राहुल गांधी आक्रमक..

पुणे : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू असून विविध मुद्द्यांवरून सभागृहात वातावरण तापलं आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना सभागृहात बोलू न देण्याच्या प्रमुख मुद्द्यावरून आतालोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याविरोधात काँग्रेसने नियम ९४(क) अंतर्गत अविश्वास ठराव दाखल केला आहे.

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याविरोधात काँग्रेसने अविश्वास ठराव मांडला आहे.विरोधकांचा आवाज दाबल्याचा आरोप करत 118 खासदारांच्या सह्यांसह प्रस्ताव सादर करण्यात आला असून एनडीए बहुमतामुळे तो टिकण्याची शक्यता कमी आहे.मात्र लोकसभेमध्ये राहुल गांधी अन् प्रियंका गांधी आक्रमक झाले आहेत.
नियम ९४(क) नुसार, लोकसभेतील विरोधी पक्षाने ओम बिर्ला यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्तावाची सूचना लोकसभेच्या महासचिवांना सादर केली आहे. या सूचनेवर 118 खासदारांच्या स्वाक्षऱ्या आहेत. काँग्रेस, सपा, डावे आणि राजदसह जवळजवळ सर्व विरोधी पक्षांच्या खासदारांनी या प्रस्तावावर सह्या केल्या आहेत.

काँग्रेस खासदार प्रियंका गांधी वड्रा म्हणाल्या की, सभापतींनी स्वतःचा अनादर केला आहे. त्यांच्यावर विधान करण्यासाठी दबाव आहे, हे चुकीचे आहे. पंतप्रधानांवर कुणी हल्ला करण्याचा प्रश्नच नाही. अध्यक्षांवर सरकारने दबाव आणला आहे. त्यामुळे अध्यक्षांना पंतप्रधान सभागृहात येणार नसल्याचे स्पष्टीकरण द्यावे लागले, हे अतिशय चुकीचं आहे.असे त्यांनी म्हटले आहे.