रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या! १५ जानेवारीपासून १७ हून अधिक गाड्या रद्द; ‘या’ मार्गावरील प्रवाशांचे होणार हाल…

पुणे : पुण्यातील रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पुणे रेल्वे स्थानकातून धावणाऱ्या एकूण १७ रेल्वे गाड्या जानेवारी महिन्यात ठराविक कालावधीसाठी रद्द करण्यात येणार आहेत.

पुणे विभागातील दौंड ते मनमाड रेल्वे मार्गावर मोठ्या पायाभूत सुविधांचे काम हाती घेण्यात आले असून, त्याचा थेट परिणाम प्रवासी सेवांवर होणार आहे. या निर्णयामुळे दररोज प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना काही काळ अडचणींचा सामना करावा लागणार आहे.
रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार दौंड ते मनमाड या महत्त्वाच्या रेल्वे मार्गावरील दौंड ते काष्टी स्थानकादरम्यान दुहेरीकरणाचे काम केले जाणार आहे. हे काम याच महिन्यात सुरू होणार असून, त्यासाठी रेल्वे मार्गावर ब्लॉक घेतला जाणार आहे.

दरम्यान, १५ जानेवारीपासून या दुहेरीकरणाच्या कामाला सुरुवात होणार असून जवळपास दहा दिवस हे काम सुरू राहणार आहे. याच पार्श्वभूमीवर 14 ते 26 जानेवारी २०२६ या कालावधीत या मार्गावरील बहुतांश रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आले असून काही गाड्या पूर्णपणे रद्द करण्यात आल्या आहेत.
दुहेरीकरणाच्या कामामुळे १४ ते २५ जानेवारीदरम्यान पुणे ते सोलापूर दरम्यान धावणाऱ्या काही महत्त्वाच्या एक्सप्रेस आणि डेमू गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. पुणे-सोलापूर एक्सप्रेसच्या काही फेऱ्या तसेच पुणे-सोलापूर डेमू आणि पुणे-दौंड डेमू या प्रवासी गाड्यांचा यात समावेश आहे. या गाड्यांवर दररोज मोठ्या संख्येने प्रवासी अवलंबून असतात. विशेषतः नोकरी, शिक्षण आणि दैनंदिन कामासाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या निर्णयाचा मोठा फटका बसणार आहे.
या कालावधीत प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करताना पर्यायी गाड्या किंवा इतर वाहतूक सुविधांचा विचार करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. तसेच काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले असून, त्या गाड्या पुणे स्थानकावर येणार नसल्याची माहितीही प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, २३ ते ३६ जानेवारीदरम्यान लांब पल्ल्याच्या काही महत्त्वाच्या गाड्याही रद्द करण्यात येणार आहेत. या कालावधीत पुणे-नागपूर गरीब रथ एक्सप्रेससह पुणे-अमरावती एक्सप्रेस, अजनी-पुणे एक्सप्रेस, निजामाबाद-पुणे एक्सप्रेस आणि पुणे-नांदेड एक्सप्रेस या गाड्या रद्द राहणार आहेत. या गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना विशेषतः गैरसोय होणार आहे, कारण या मार्गांवर पर्यायी थेट रेल्वे सेवा मर्यादित आहे.