ठाकरेंचा पराभव जिव्हारी ; ‘या ‘महापालिकेत ज्येष्ठ नेत्याचा राजीनामा, घेतला मोठा निर्णय

कोल्हापूर : राज्यातील महापालिका निवडणुकांचे निकाल पूर्णपणे स्पष्ट झाले आहेत. राज्यात भाजपने काही ठिकाणी बाजी मारली आहे. अशातच आता पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या कोल्हापूरमध्ये ठाकरेंना मोठा दणका बसला आहे. या निवडणुकीत झालेला पराभव जिव्हारी लागल्याने ज्येष्ठ नेत्यांन राजीनामा दिला आहे.

कोल्हापूर महापालिका निवडणुकीत अपेक्षित यश न मिळाल्याने.उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे कोल्हापूर शहर प्रमुख सुनील मोदी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. कोल्हापूर महानगरपालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत पक्षाला अपेक्षित यश न मिळाल्याने त्यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे. यश न मिळाल्याची संपूर्ण राजकीय व नैतिक जबाबदारी स्वीकारत त्यांनी हा निर्णय घेतला आहे.


विशेष म्हणजे, कोल्हापुरातील काँग्रेसचे नेते आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी युतीधर्म पाळत आपल्या पक्षाच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी केलेले प्रयत्न उल्लेखनीय असल्याचेही त्यांनी राजीनाम्यात नमूद केले आहे.पदावर राहून स्पष्टीकरण देण्यापेक्षा राजकीय जबाबदारी स्वीकारून निर्णय घेणे अधिक योग्य वाटल्याने आपण शहर प्रमुख पदाचा राजीनामा दिल्याचे सुनील मोदी यांनी स्पष्ट केले आहे.
महापालिका निवडणुकीत लागलेला निकाल ठाकरें गटाच्या नेत्याच्या जिव्हारी लागल्याने सुनील मोदी यांनी राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.निवडणूक प्रक्रियेदरम्यान स्थानिक पातळीवरील अंतर्गत गटबाजी, समन्वयाचा अभाव आणि संघटनात्मक दुर्लक्ष याचा थेट फटका पक्षाला बसल्याचे त्यांनी राजीनामा पत्रात नमूद केले आहे.
