राज्यातील सहकारी संस्थाच्या निवडणूका पुढे ढकलल्या, कारणही आले समोर…

मुंबई : राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात महत्त्वाची बातमी समोर आली आहे. या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात ३० जूननंतर होणाऱ्या संस्थांच्या निवडणुका आता ३० सप्टेंबर नंतर होणार आहेत.
सहकार मंत्री अतुल सावे यांनी याबाबतचा निर्णय घेतला आहे. राज्यातील ४२ हजार १५७ संस्थांच्या निवडणुका पूर्ण झाल्या असून ६ हजार ५१० संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया सुरु आहेत.
राज्यात मान्सूनचे दमदार आगमन झाले असून, ३० जूननंतर राज्यभरात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. यामुळे सर्वच सहकारी संस्थांच्या पंचवार्षिक निवडणुका पुढे ढकल्यात आल्याची माहिती आहे.
पावसाळ्यात नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक ठिकाणी निवडणूक घेणं कठीण होते. यासोबतच शेतकरी पेरणीच्या कामात व्यस्त असल्याने मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.
ज्या सहकारी संस्थांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे, अशा संस्थांचं निवडणूक कामकाज पूर्णपणे पावसाळ्यात होणार आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेत बाधा निर्माण होऊ शकते. याच कारणांमुळे निवडणूका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले गेले आहे.
राज्यात ८२ हजार ६३१ सहकारी संस्था निवडणुकीस पात्र आहेत. त्यापैकी ४९,३३३ सहकारी संस्थांच्या प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध झालेल्या असून ४८ हजार ६६७ संस्थांच्या अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत. राज्यातील ४२ हजार १५७ संस्थांच्या निवडणुका पूर्ण झाल्या असून ६ हजार ५१० संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया सुरु आहेत.