पहलगाम हल्ल्यात महाराष्ट्रातील ‘इतक्या’ पर्यटकांचा मृत्यू, आकडा आला समोर..

जम्मू काश्मीर : काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या पर्यटकांची संख्या वाढत असून, यात महाराष्ट्रातील नागरिकांचाही समावेश आहे. नुकत्याच आलेल्या ताज्या अपडेटनुसार, पुण्यातील आणखी दोन जखमी पर्यटकांचा मृत्यू झाल्याने राज्यात शोककळा पसरली आहे.
तसेच या हल्ल्यात सुरुवातीला २६ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले होते. मात्र, मंगळवारी रात्री उशिरा पुण्यातील कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. हे दोघेही आपापल्या कुटुंबासह पर्यटनासाठी काश्मीरला गेले होते. हल्लेखोरांनी त्यांच्यावर धर्म विचारून गोळीबार केल्याचे जखमींनी सांगितले आहे.
दरम्यान, सध्या गणबोटे कुटुंबातील सदस्य तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. या घटनेनंतर जगदाळे आणि गणबोटे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. महाराष्ट्रातील जखमी आणि मृतांची संख्या पाहता, या हल्ल्याने राज्याला मोठा हादरा बसला आहे.
डोंबिवलीतील अतुल मोने, संजय लेले आणि हेमंत जोशी यांचाही या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला आहे. तसेच पनवेलमधील दिलीप देसले यांचाही मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. यासह आतापर्यंत एकूण मृतांची संख्या २८ वर पोहोचली आहे. तर पाच जण अद्यापही जखमी आहेत – एस. बालचंद्रू, सुबोध पाटील, शोबीत पटेल, संतोष जगदाळे, आणि कौस्तुभ गणबोटे (मृत्यू पावले).
दहशतवादी संघटना टीआरएफने या भ्याड हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. विशेष म्हणजे, बर्फवृष्टीनंतर मोठ्या संख्येने पर्यटक काश्मीरमध्ये पोहोचले होते. अनेक काश्मिरी नागरिक हा आनंद अनुभवत असतानाच, या हल्ल्यामुळे पुन्हा भयग्रस्त वातावरण तयार झाले आहे.