धक्कादायक! वडिलांच्या ‘ त्या ‘त्रासाला वैतागली,चिठ्ठी लिहित पुण्यातील संजीवनीनं आयुष्य संपवलं

पुणे :पुण्यातील नांदेड गाव परिसरातील जिजाबाईनगर येथे 17 वर्षीय शालेय विद्यार्थिनीने वडिलांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत तिने वडिलांकडून होत असलेल्या मानसिक त्रासाला कंटाळून हे टोकाचं पाऊल उचलल्याचा स्पष्ट उल्लेख केला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, संजीवनी जीवन रोडे (वय 17) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. वडील जीवन रोडे यांना दारूचे व्यसन असून, ते वारंवार मुलांना शिवीगाळ करत आणि त्रास देत असत. संजीवनीची आई शीला रोडे या घरकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. २९ सप्टेंबर रोजी सकाळी शीला रोडे नेहमीप्रमाणे कामासाठी घराबाहेर गेल्या होत्या. त्यावेळी घरी जीवन रोडे आणि त्यांची तीन मुलं होती. दुपारी संजीवनीची मोठी बहीण कामावर गेल्यानंतर संजीवनी, तिचा लहान भाऊ आणि वडील घरी होते. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास शीला रोडे यांना फोनवरून मुलगी संजीवनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती मिळाली.
याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून, मुलीचे वडील जीवन गणपती रोडे (वय ४५) यांच्याविरुद्ध नांदेड सिटी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.घटनास्थळी तपासणी केली असता, पोलिसांना संजीवनीने लिहिलेली एक चिठ्ठी मिळाली. त्या चिठ्ठीत तिने वडिलांकडून होणाऱ्या सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचे स्पष्ट लिहिले आहे.

एका शाळकरी मुलीने वडिलांच्या जाचामुळे आपले जीवन संपवल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तसंच या घटनेनं खळबळही उडाली आहे. नांदेड सिटी पोलिसांनी याप्रकरणी पुढील तपास सुरू केला आहे

