मद्यप्रेमींना झटका! बिअर-दारू महागणार? जाणून घ्या कारण…

पुणे : भारतातील मद्यप्रेमींसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. येत्या काही दिवसांत बिअरसह विविध मद्यांच्या किमती वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. उत्पादन खर्चात झालेल्या मोठ्या वाढीमुळे मद्य उत्पादक कंपन्यांनी राज्य सरकारांकडे दरवाढीसाठी मागणी केली आहे. सरकारकडून मंजुरी मिळाल्यास ग्राहकांना लवकरच जास्त पैसे मोजावे लागू शकतात.

दरम्यान, उन्हाळ्याच्या हंगामात बिअरची मागणी नेहमीच वाढते. अशा वेळी उत्पादन खर्च वाढल्याने आणि पुरवठ्यावर परिणाम झाल्यास बाजारात तुटवड्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर मद्य उद्योगात सध्या चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून पुढील काही दिवसांत परिस्थिती कशी बदलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गेल्या काही आठवड्यांत मद्यनिर्मितीसाठी लागणाऱ्या पॅकेजिंग साहित्याच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. काचेच्या बाटल्यांचे दर तब्बल 20 टक्क्यांनी वाढले असून पॅकिंग मटेरियलच्या किमतीतही 10 ते 12 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे.

यासोबतच ॲल्युमिनियमच्या तुटवड्यामुळे बिअर कॅन्सच्या उपलब्धतेवरही परिणाम होत असल्याचे चित्र आहे. या सर्व घटकांचा थेट परिणाम उत्पादन खर्चावर होत असून त्यामुळे मद्य उद्योगासमोर नवे आव्हान उभे राहिले आहे.
याशिवाय इंधन दरवाढीचा परिणाम मालवाहतुकीवरही झाला असून वाहतूक खर्चात सुमारे 10 टक्क्यांची वाढ झाली आहे. परिणामी, उत्पादनाचा एकूण खर्च अधिक वाढला आहे.
उद्योग क्षेत्रातील संघटनांच्या मते, या वाढत्या खर्चाचा थेट परिणाम मद्याच्या अंतिम किमतीवर होत असून ग्राहकांना येत्या काळात अधिक दर मोजावे लागू शकतात.मद्य उद्योगाशी संबंधित संघटनांच्या मते, जागतिक घडामोडींचाही या परिस्थितीवर मोठा परिणाम झाला आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील संघर्ष आणि पुरवठा साखळीतील अडथळ्यांमुळे कच्च्या मालाचा तुटवडा निर्माण झाला आहे. विशेषतः कागदी पुठ्ठ्यांच्या किमतीत मोठी उसळी पाहायला मिळत असून काही प्रकरणांमध्ये दर तब्बल 100 टक्क्यांपर्यंत वाढल्याचे सांगितले जात आहे. या वाढीमुळे उत्पादन खर्चावर अतिरिक्त ताण निर्माण झाला आहे.