Shirur News : ‘घोडगंगा’ कारखाना सुरू होणार की नाही? संचालकांना अद्याप कारखाना सुरू होणार की नाही हे माहित नाही..

Shirur News शिरूर : राज्यातील अनेक साखर कारखान्यांनी सन २०२३- २४ चा गळीत हंगाम सुरू केला असून, दोन लाख ते तीन लाख टन उसाचे गाळप केले आहे. या पार्श्वभूमीवर रावसाहेबदादा पवार घोडगंगा साखर कारखान्याचा गळीत हंगाम कधी चालू होणार आहे व कारखाना चालू होणार आहे की नाही, याबाबतची भूमिका कारखान्याचे अध्यक्ष ऋषिराज पवार, कार्यकारी संचालक प्रवीण शिंदे व कारखान्याचे सर्वेसर्वा, आमदार अशोक पवार यांनी ऊस उत्पादक सभासदांसमोर विशद करावी, अशी मागणी कारखान्यातील विरोधी गटाचे संचालक दादा पाटील फराटे यांनी येथे केली. Shirur News
घोडगंगा कारखान्याच्या निवडणुकीला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर कारखान्याची सद्यःस्थिती मांडण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दादा पाटील फराटे यांनी कारखान्याच्या कारभाराबाबत अनेक आरोप केले. कारखान्याच्या अधोगतीला केवळ आमदार अशोक पवार जबाबदार असून, स्वतःच्या अपयशाचे खापर ते इतरांच्या माथी फोडतात, अशी टीकाही त्यांनी केली.
सहकारी साखर कारखानदारी टिकावी, या भूमिकेचे आम्ही असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कारखाना सुरू करण्यासाठी येत्या दहा डिसेंबरपर्यंत मुदत देत आहोत. त्यानंतर विरोधी संचालक म्हणून आम्ही योग्य तो पवित्रा घेऊ, असे ते म्हणाले.
कारखान्याचे माजी संचालक सुधीर फराटे, शिरूर बाजार समितीचे संचालक राहुल गवारे, भाजपचे तालुकाध्यक्ष आबासाहेब सोनवणे, युवा नेते राजेंद्र कोरेकर, ‘पीएमआरडीए’चे संचालक प्रकाश गव्हाणे, मलठण सोसायटीचे उपाध्यक्ष प्रमोद दंडवते, भाजप सहकार आघाडीचे तालुकाध्यक्ष उमेश शेलार, एकनाथ थोरात, दत्तोबा शेंडगे, अशोक गारगोटे, रणजित शेलार आदी यावेळी उपस्थित होते.
दादा पाटील फराटे म्हणाले, “सहकार वाचवायचा आणि खासगी साखर कारखानदारीचे आव्हान थोपवायचे, या भूमिकेतून आम्ही गतवर्षी घोडगंगा कारखान्याच्या निवडणुकीला सामोरे गेलो. ‘मताला पैसे नाही, पण उसाला प्रतिटन तीन हजार रुपये दर देणारच,’ असे आश्वासन दिले.
आमच्या पॅनलला ४७ टक्के मते पडली. पण, मी वगळता पॅनेलचा पराभव झाला. त्या निवडणुकीत आम्ही कारखान्याची जी परिस्थिती सभासदांसमोर मांडली होती, तेच वास्तव होते, हे आज कारखान्याच्या परिस्थितीवरून लक्षात येत आहे. कारखान्यावर कुठलेही थकीत कर्ज नाही,’ असे आमदार पवार यांनी निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सांगितले होते. ही संस्था माझ्या वडीलांच्या नावाने असल्याने ती बंद पडू देणार नाही,’ असे भावनिक आवाहन केले होते. पण, ते धादांत खोटे होते, हे आता स्पष्ट दिसत आहे.’
कामगारांनी शंभर दिवस काम बंद आंदोलन केले, मात्र, आपल्यामुळे संस्थेच्या कामकाजात अडथळे येऊ नये, या उद्देशाने मागण्या पूर्ण न होताही संप मागे घेतला. मात्र, कारखान्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी कुठलीही साधनसामग्री उपलब्ध नाही. ऊसतोड टोळ्या भरल्या नाहीत, बॉयलरचे काम अर्धवट आहे, ऊसतोड व वाहतूक यंत्रणा नाही.
कारखाना चालू होणार आहे किंवा नाही हे आमदार व अध्यक्षांनी ऊस उत्पादक सभासदांना सांगावे. सभासदांनी उसाचे काय करायचे, तो कुठल्या कारखान्याला द्यायचा, याबाबतची भूमिका वेळेतच स्पष्ट करावी. अन्यथा ऊसउत्पादकांचे मोठे नुकसान होऊ शकते. सद्यःस्थितीत सभासदांत संभ्रमाचे वातावरण आहे,’ असे दादा पाटील फराटे यांनी सांगितले.
आमदार पवार यांनी कारखान्यातील स्वतःचे अपयश झाकण्यासाठी कधी मला कधी स्व. आमदार बाबूराव पाचर्णे यांना, कधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जबाबदार धरले असून, आता कर्ज न मिळण्याबाबत ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जबाबदार धरीत असल्याचा आरोपही दादा पाटील फराटे यांनी केला.