दौंडमध्ये शरद पवार यांना मोठा धक्का! ‘या’ एकमेव विश्वासू नेत्याने भाजपमध्ये केला प्रवेश, उमेदवारीही मिळाली..

दौंड : दौंड तालुक्यात मोठी राजकीय घडामोड घडली असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) यांना जोरदार धक्का बसला आहे. शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांचे विश्वासू मानले जाणारे दौंड तालुकाध्यक्ष आप्पासाहेब पवार यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने स्थानिक राजकारणात खळबळ उडाली आहे.

भाजपचे दौंडचे आमदार राहुल कुल यांनी ही खेळी यशस्वी करत विरोधकांच्या गडाला धक्का दिला असल्याचे चित्र आहे. दौंड हा गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जात होता. संघटनात्मक ताकद, कार्यकर्त्यांशी थेट संवाद आणि स्थानिक पातळीवरील प्रभावामुळे आप्पासाहेब पवार यांचे तालुक्यात विशेष वजन होते. त्यामुळे त्यांच्या पक्षांतरामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा फटका बसल्याची चर्चा सुरू झाली आहे.


आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही घडामोड अधिक महत्त्वाची ठरत असून राजकीय समीकरणे झपाट्याने बदलताना दिसत आहेत. आमदार राहुल कुल यांनी खडकी-देऊळगाव राजे गटातून आप्पासाहेब पवार यांना थेट उमेदवारी देत भाजपचा मोठा डाव टाकल्याचे बोलले जात आहे.
केवळ पक्षप्रवेशापुरते न थांबता त्यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतल्याने भाजपने त्यांच्यावर विश्वास व्यक्त केल्याचे स्पष्ट झाले आहे. या निर्णयामुळे दौंड तालुक्यातील राजकीय समीकरणे एका क्षणात बदलली असून अनेक कार्यकर्ते आणि स्थानिक नेतेही नव्या भूमिकेकडे पाहू लागले आहेत.
या घडामोडीमुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटात अस्वस्थता वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दौंड तालुक्यातील अनेक पदाधिकारी आणि समर्थकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून काही जण भाजपकडे झुकण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. यामुळे पुणे जिल्ह्यातील राजकारणावरही दूरगामी परिणाम होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
आप्पासाहेब पवार यांना दौंड तालुक्यात मानणारा स्वतंत्र वर्ग आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांच्या नेतृत्वाखाली खासदार सुप्रिया सुळे यांना दौंडमध्ये चांगले मताधिक्य मिळाले होते. मात्र विधानसभेच्या वेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाने त्यांना डावलून माजी आमदार रमेश थोरात यांना उमेदवारी दिल्याने ते नाराज असल्याची चर्चा होती. पक्षाकडून अपेक्षित संधी न मिळाल्याने अखेर त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.
