जेष्ठ साहित्यिक व निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकरांचं निधन, ८८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास..

मुंबई : ज्येष्ठ साहित्यिक-लेखक, सेवानिवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांचे निधन झाले. वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी छत्रपती संभाजीनगरमधील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती.

मराठी साहित्यविश्व आणि न्यायव्यवस्थेतून मोठं व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेलं आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, तीन विवाहित मुली, जावई नातवंडे असा परिवार आहे.
मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होण्यापूर्वी सन १९६१ ते ६२ मध्ये ते लातूरच्या दयानंद विज्ञान महाविद्यालयाच्या मराठी विभागाचे पहिले प्रमुख होते. वर्धा येथे झालेल्या ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद ही त्यांनी भूषवले.

मराठवाडा, मराठवाड्यातील सामाजिक वास्तव उर्वरित महाराष्ट्रात पोहोचवण्यात नरेंद्र चपळगावकर यांचा मोठा सहभाग होता. नरेंद्र चपळगावकर यांचे मूळ गाव सोलापूर जिल्ह्यातील चपळगाव असले तरी त्यांच्या कुटुंबाच्या गेल्या काही पिढ्या बीड येथे गेल्यामुळे ते मूळचे बीडचेच झाले.
बीडमधून केसरी, सकाळ, मराठवाडा, लोकसत्ता अशा अनेक वर्तमानपत्रांसाठी त्यांनी लेखन केलं आहे. १६ वर्षे वकिली केल्यानंतर मुंबईत काही काळ वकिली केली. औरंगाबाद येथे मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायपीठ स्थापन झाल्यावर त्यांना उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून काम करण्याची संधी मिळाली.
चपळगावकर यांनी १९६२ ते १९७८ या काळात बीडमध्ये वकिली केली. त्यानंतर १९७९ ते १८८१ दरम्यान मुंबई उच्च न्यायालयात वकिली केली. आणि १९८१ पासून मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद पीठाचे न्यायाधीश म्हणून काम केले.
मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून त्यांची १९ जानेवारी १९९० मध्ये नियुक्ती झाली आणि कायमचे न्यायाधीश म्हणून २० नोव्हेंबर १९९० रोजी नियुक्ती झाली. १० एप्रिल १९९९ रोजी ते निवृत्त झाले. मराठी साहित्यातला मोठा विचारवंत आणि अभ्यासक असणाऱ्या नरेंद्र चपळगावकरांनी मराठी साहित्यविश्वात मोलाची भर टाकली आहे.