‘घोडगंगा’ची अडचण सत्ता आली की दूर होईल! अशोक पवार यांना विधानसभेत पाठवा-शरद पवार यांची साद….


वडगाव रासाई : शिरुर तालुक्याच्या शेतक-यांची संस्था असलेला घोडगंगा सहकारी साखर कारखान्याची जी अडवणुक केली गेली आहे. ती सत्तापालट झाल्यानंतर दुर होईल.इथल्या शेतक-यांनी चिंता करु नये असे प्रतिपादन देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले. वडगाव रासाई(ता.शिरुर) येथे महाविकास आघाडीचे उमेदवार अशोक पवार यांच्या प्रचारार्थ देशाचे नेते शरद पवार यांची सभा आयोजित करण्यात आली होती.यावेळी पवार हे बोलत होते.

यावेळी बोलताना ते म्हणाले कि, आपल्याकडे असलेल्या सत्तेचा वापर हा लोकांचा संसार फुलवण्यासाठी करायचा असतो, पण हल्ली महाराष्ट्रामध्ये जे लोक सत्तेत आहेत त्यांनी ठरवले की येथील कारखान्याला मंजुर असलेले कर्जाचे पैसे द्यायचेच नाहीत. मी बँकेची बैठक घेतली त्यावेळी बँकेने सांगितले की घोडगंगेला पैसे देता येतील काही अडचण नाही. घोडगंगा पेक्षा जास्त अडचणीत असलेल्या सहा कारखान्यांना कर्ज दिले.घोडगंगेला कर्ज देण्यात काहीही अडचण नाही असे अधिकाऱ्यांनी सांगितले. काहीच अडचण नाही असं म्हणता मग पैसे का देत नाही? असे मी विचारलं, त्यावेळी त्यांनी सांगितले कि, पैसे आहेत मात्र राज्य सरकारने अडवले आहे.

मी घोडगंगाला कर्ज मिळावे यासाठी स्वतः मुख्यमंत्र्यांकडे गेलो. त्यांना विचारले कि, घोडगंगेला कर्ज मिळण्यात काय अडचण आहे? कारखान्याला कर्ज मंजूर आहे पैसे उपलब्ध झालेले आहेत मग काय अडचण तर त्यावर मुख्यमंत्री म्हणाले की माझी अडचण आहे. तुम्ही समजून घ्या याचाच अर्थ असा आहे की त्यांच्यावर कुणीतरी कारखान्याला कर्ज मिळू नये यासाठी दबाव टाकत होते.कर्ज मिळु नये यासाठी असा दम देणारा महाराष्ट्रातील नेता कोण हे तुम्ही समजून घ्या.यावेळी उपस्थित मतदारांनी 50 खोके एकदम ओके अशा प्रकारच्या घोषणा दिल्या.

यावेळी पवार पुढे म्हणाले कि, प्रचारसभांच्या निमित्ताने मी महाराष्ट्रभर फिरत आहे.यात दिसून येते की महाराष्ट्रातील जनतेने राज्यामध्ये सत्तापालट करण्याचा निर्णय घेतलेला आहे. राज्यात सत्ता आल्यानंतर मंजूर झालेल्या कर्जाची रक्कम घोडगंगेला कशी मिळत नाही ते मी पाहतो. आणि त्यानंतर सर्वांचा ऊस तुमच्याच सहकारी साखर कारखान्यालाच गाळपासाठी जाईल असा मी तुम्हाला विश्वास देतो. आपल्या सर्वांचे प्रश्न सोडवण्यासाठी अशोक पवारांना निवडून द्या असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

यशवंत सहकारी साखर कारखान्याबाबत बोलताना ते म्हणाले कि,शिरुर मतदारसंघाला जोडलेला हवेली तालुक्यातील काही भागातील शहरीकरण वाढल्यामुळे या परिसरातील उसाचे क्षेत्र कमी झाले व त्याचा परिणाम म्हणून हवेली मध्ये असणारा साखर कारखाना अडचणीत आला. साखर कारखानदारी चालू राहावी यासाठी सरकारकडून जी मदत मिळत असते ती मदत सर्वच कारखान्यांना समान स्वरूपात मिळाली पाहिजे. मी एनसीडीसीचा दहा वर्षे अध्यक्ष होतो त्या काळामध्ये कारखान्यांना कर्ज देत असताना कधीही भेदभाव केला नाही.

या प्रसंगी बोलताना आमदार अशोक पवार म्हणाले कि, वाघोलीत वाहतुक समस्या आहे. माञ पवार साहेबांच्या आशीर्वादाने वाघोली ते शिरुर दुमजली पुल मंजूर झाला आहे.विरोधकांकडुन मला सातत्याने त्रास दिला जात आहे. शिरूर तालुक्यावर साहेबांचे अनंत उपकार आहे. भिमानदीला पूर आल्यानंतर सर्वप्रथम पवार साहेबच या परिसरात आले होते.

कोरोना काळात मी पाच कोविड सेंटर प्रामाणिक पणे चालवली. पवार साहेबांनी औषधे मिळवून दिली. कोरोना काळात साहेबांनी मोठे सहकार्य केले. अडीच वर्षे भयानक काळ होता. शासनाचा निधी, डीपीडीसी निधी सुद्धा मिळत नव्हता. राज्यात जे फोडाफोडीचे राजकारण झालं आहे. त्यामुळे जनता तुम्हाला शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही. सध्या माफिया गँग एकत्र आली आहे. त्यांना मोठे व्हायचे आहे. माझा मुलगा ऋषीराज याच्याबाबत जे झाले ते खालच्या स्तराच राजकारण झाले.

हवेलीतील यशवंत चालू करावा यासाठी कोणी शंभर दिवसांचे आश्वासन दिले त्या दिवसाला दहा वर्षे झाले. माञ कारखाना सुरु झाला नाही. जनतेची खात्री आहे पवार साहेबांनी शब्द दिला आहे. घोडगंगा सुरु करुच. माणसे घडवायचे काम साहेबांनी केलं आता विरोधकांकडुन गाडायचं काम केले जात आहे.खासदार म्हणुन सुप्रिया ताई, अमोल कोल्हे हे उत्तम काम करत आहे. आम्ही पवार साहेबांच्या मागे सगळेजण ताकदीनं उभे राहू असे ते म्हणाले.

या प्रसंगी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे, उत्तमराव जानकर, ॲड.हेमा पिंपळे, के.डी.कांचन, ऋषीराज पवार आदींची भाषणे झाली. यावेळी जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे, विश्वास ढमढेरे, संजय सातव, बाळासाहेब नागवडे, पोपट शेलार, संजय देशमुख आदी उपस्थित होते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!