पुण्यातील रिक्षा चालकांना 17 वर्षांनंतर येणार अच्छे दिन? ‘ती’ योजना आली समोर…!

पुणे : सध्या राज्याच्या बजेटमध्ये केलेल्या घोषणेमुळे रिक्षाचालक पुन्हा सुखावले आहेत. ही घोषणा पुन्हा हवेतच जाऊ देऊ नका, अशी अपेक्षा रिक्षाचालकांकडून व्यक्त केली जात आहे. रिक्षाचालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याच्या घोषणा यापूर्वी अनेकदा झाल्या आहेत.

पहिल्यांदा अशी मागणी 2005 साली रिक्षाचालकांकडून झाली होती. पुण्यातील रिक्षा संघटनांनी एकत्र येत 2005 साली रिक्षाचालक कल्याणकारी मंडळ स्थापन व्हावे, यासाठी मागणी केली होती.
याबाबत हा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात आला होता. या घटनेला आता 17 वर्षे उलटली आणि हा प्रस्ताव अजूनही बारगळलेलाच आहे. यामुळे रिक्षाचालकांमध्ये असंतोषाचे वातावरण होते. असे असताना मात्र, आता रिक्षाचालकांमध्ये पुन्हा एक आशा निर्माण झाली आहे.

रिक्षा कल्याणकारी मंडळ स्थापन करणे, ही 2005 सालापासून रिक्षाचालकांची मागणी आहे. आता राज्य शासनाने याची घोषणा केली. त्याचे स्वागत आहे. फक्त ही घोषणा न ठेवता तातडीने अंमलबजावणी करून मंडळाची स्थापना करावी.