माथाडीच्या नावाखाली तसेच इतर कारणांवरून खंडणी मागणाऱ्यांची तक्रार करा;पोलिस आयुक्त रितेश कुमार यांचे नागरिकांना आवाहन…!

उरुळी कांचन : माथाडीच्या नावाखाली तसेच इतर कारणांवरून व्यापारी, बांधकाम व्यावसायिक तसेच उद्योजकांना खंडणी मागणाऱ्यांची तक्रार बिनदिक्कतपणे पोलिसात करावी तसेच पोलिसांनी देखील संबंधित तक्रार तात्काळ दखल घेऊन कठोर कारवाई करावी असे स्पष्ट आदेश पुणे शहर पोलीस दलाचे आयुक्त रितेश कुमार यांनी दिले आहेत.
वाघोली-खराडी च्या आयटी व बांधकाम विभागात तसेच झोन ४ च्या हद्दीत अशाप्रकारे खंडणी मागणाऱ्यांची तक्रार करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.गुन्हेगारीमुळे पुण्यातून सहा हजार कोटींचा प्रकल्प कर्नाटकात गेला. त्यामुळे खंडणीखोरांना ठेचून काढा अन्यथा तुमच्यावरच कारवाई होईल, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना आदेश दिले होते.
या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी गुन्हेगार आणि खंडणी बहाद्दरांविरोधात कठोर कारवाईचा निर्णय घेतला आहे.
औद्योगिक कंपन्या, आयटी कंपन्या, व्यापारी संघटना, चेंबर आॅफ कॉमर्स, इंडस्ट्रीज, अॅग्रीकल्चर संघटनांचे उद्योजक प्रतिनिधींची बैठक पोलिस आयुक्तालयात नुकतीच पार पडली. गुन्हेगारी टोळ्या अनधिकृत माथाडी संघटना आणि माथाडींच्या नावाखाली व्यापारी, उद्योजकांना त्रास देत आहेत. हा त्रास होऊ नये, या उद्देशाने पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी स्वत: ही बैठक बोलावली होती.
यासोबतच नोकरदार महिलांची सुरक्षिततेबाबत विशाखा कमिटी, वाहतूक समस्या आणि सरकारी खात्यांबाबत प्राप्त तक्रारींबाबत बैठकीत चर्चा झाली. शहरात गुन्हेगारी टोळ्यांमार्फत खंडणी वसुली, तसेच काही माथाडी कामगारांकडून अवास्तव पैशांची मागणी केली जाते. वर्गणीच्या नावावर खंडणी मागितली जाते, यावर आळा घालावा. माथाडी कामगारांचे मजुरीचे दर जाहीर करावेत. वाहतूक समस्येबाबत उपाययोजना कराव्यात, अशी मागणी संघटनांच्या प्रतिनिधींनी केली.
त्यावर पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी व्यापारी, उद्योजकांना खंडणी मागणाऱ्या गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्यात येईल. याबाबत संबंधित पोलिस उपायुक्त आणि पोलिस ठाण्यांनी उचित कारवाई करावी. तसेच, वाहतूक समस्यांबाबत कंपन्यांशी संपर्क साधून ट्रॅफिक वार्डनची संख्या वाढवावी, असे निर्देश वाहतूक पोलिस उपायुक्तांना दिले.
पोलीस आयुक्तांनी बैठक घेतल्यानंतर झोन ४ च्याहद्दीत येणाऱ्या लोणीकंद, येरवडा, चंदननगर, विमानतळ, विश्रांतवाडी, खडकी, चतुश्रुंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील व्यापारी संघटना, बांधकाम व्यावसायिक, आयटी कंपन्यांच्या असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन देखील त्यांना व्यवसायात येणाऱ्या समस्यांबाबत तसेच अडचणींबाबत, माथाडी कामगारांचे नावाखाली दमदाटी करुन पैसे उकळणे, स्थानिक लोकांकडुन दमदाटी, वाहतुक समस्या, पथारीवाले, गाड्याचे सायलेंसरमध्ये बेकायदेशीर बदल करुन फटाक्यांचा आवाज काढणे इत्यादी विषयांवर पूर्व प्रादेशिक विभाग अप्पर पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा व पोलीस उपआयुक्त शशिकांत बोराटे यांनी मार्गदर्शन करुन वरील समस्यांबाबत कोणाला काही अडचण असल्यास तात्काळ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देणेबाबत आवाहन केले.