द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा! उपमुख्यमंत्री अजित पवारांची मोठी घोषणा..

मुंबई : राज्य सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध असून द्राक्ष उत्पादकांच्या मागण्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आवश्यक आर्थिक तरतूद केली जाईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे.

दरम्यान, कार्यक्रमादरम्यान काही द्राक्ष उत्पादकांनी १० अश्वशक्ती क्षमतेच्या कृषिपंपांचे वीजबिल माफ करण्याची मागणी केली. त्यावर पवार म्हणाले, ही मागणी न्याय्य असून मर्यादित प्रमाणात असे पंप असतील तर त्यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत निश्चित तोडगा काढू. शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्य सरकार कोणतीही कसर ठेवणार नाही.
पवार यांनी स्पष्ट केले की, द्राक्ष उत्पादकांच्या केंद्र सरकार पातळीवरील मागण्या दिल्लीतील अधिकाऱ्यांशी व केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा करून मार्गी लावल्या जातील. महाराष्ट्रातील द्राक्ष उत्पादकांमुळे राज्यात खरी समृद्धी आली आहे. त्यामुळे त्यांचे प्रश्न सोडवणे ही आमची जबाबदारी आहे, असेही ते म्हणाले आहे.

दरम्यान, कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांनीही द्राक्ष उत्पादकांना आश्वस्त करताना सांगितले, मी स्वतः द्राक्ष बागायतदार आहे. त्यामुळे तुमचे प्रश्न माझ्या घरच्यांसारखे आहेत. राज्य कृषी विभाग तुमच्या उत्पादनाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहील. अध्यक्ष कैलास भोसले यांनी मांडलेल्या सूचनांची दखल घेतली जाईल.
अजित पवार यांनी अधिवेशनात देशांतर्गत बाजारपेठेवर लक्ष केंद्रित करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लागू केलेल्या करांचा परिणाम आपल्या कृषी उत्पादनांवर होऊ नये यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेष सूचना दिल्या आहेत.
राज्यात तयार होणाऱ्या उत्पादनांची खरेदी भारतीयांनी स्वतः केल्यास आपल्या शेतमालाला मोठी बाजारपेठ उपलब्ध होईल. तसेच इतर देशांतही नवीन बाजारपेठ मिळवण्यासाठी नियोजन सुरू आहे.