उपमुख्यमंत्री अजित पवारांना कथित धमकी प्रकरणी दिलासा, कोर्टानं काढलेलं समन्स रद्द

पुणे:आगामी महापालिका निवडणुका तोंडावर असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बारामती सत्र न्यायालयाने कथित धमकी प्रकरणी मोठा दिलासा दिला आहे. त्यांच्या विरोधात प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी काढलेलं समन्स रद्द करण्यात आलं आहे.

काय आहे प्रकरण?
मिळालेल्या माहितीनुसार, २०१४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारादरम्यान अजित पवारांनी बारामतीतील मासाळवाडी ग्रामस्थांना दमदाटी केल्याची चित्रफीत व्हायरल झाली होती. या प्रकरणी आम आदमी पक्षाचे तत्कालीन उमेदवार व निवृत्त आयपीएस अधिकारी सुरेश खोपडे यांनी न्यायालयात निवडणूक याचिका दाखल केली होती. निवडणुकीत अनैतिक प्रभाव टाकल्याचा आरोप त्यावेळी अजित पवारांवर करण्यात आला होता.”खासदार सुप्रिया सुळे यांना मतदान केलं नाही, तर गावाचं पाणी बंद करू,” अशी कथित धमकी अजित पवार यांनी दिली होती. या प्रकरणी न्यायालयाने त्यांना समन्स बजावलं होतं. आता हेच समन्स रद्द करण्यात आलं आहे.

दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात कार्यवाहीसाठी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने काढलेले समन्स बारामती सत्र न्यायालयाने रद्द केलं आहे. कथित धमकीची चित्रफीत अस्पष्ट असून, तिची सत्यता पडताळण्यात आलेली नाही. समन्स जारी करताना पुरेशी कारणे देण्यात आली नाहीत, असं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं आहे.
प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाच्या निर्णयाला अजित पवार यांनी सत्र न्यायालयात आव्हान दिलं होतं. हा आदेश बेकायदा असून, अप्रमाणित पुराव्यांवर आधारित आहे, असा युक्तिवाद अजित पवारांच्या वकिलांनी केला. तो ग्राह्य धरत सत्र न्यायालयाने प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाचा समन्स बजावण्याचा आदेश रद्द केला आहे.