‘या’ महिन्यापासून रेशनकार्ड होणार बंद, क्यूआर कोडयुक्त स्मार्ट शिधापत्रिका येणार, ४८ कोटींच्या खर्चास मान्यता…


पुणे : राज्यातील नागरिकांसाठी अन्न व नागरी पुरवठा व्यवस्थेत मोठा बदल होणार असून महाराष्ट्र शासनाने क्यूआर कोडयुक्त स्मार्ट शिधापत्रिका वितरित करण्यास प्रशासकीय मान्यता दिली आहे.

त्यामुळे सध्या वापरात असलेल्या कागदी रेशन कार्डांची जागा आता आधुनिक, सुरक्षित आणि टिकाऊ स्मार्ट कार्ड घेणार आहेत. या प्रकल्पासाठी सुमारे ४८ कोटी रुपयांचा खर्च मंजूर करण्यात आला आहे.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना तसेच शेतकरी योजनेतील लाभार्थ्यांना या नव्या स्मार्ट शिधापत्रिका देण्यात येणार आहेत. कागदी कार्ड खराब होणे, हरवणे, बनावट कार्ड तयार होणे किंवा गैरवापराच्या तक्रारी वाढत असल्याने शासनाने तंत्रज्ञानाधारित उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना अधिक सोपी, सुरक्षित आणि पारदर्शक सेवा मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

या स्मार्ट शिधापत्रिकांवर क्यूआर कोड असणार असून रेशन दुकानात स्कॅन केल्यावर लाभार्थ्याची संपूर्ण माहिती तत्काळ उपलब्ध होणार आहे. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांनाच धान्य वितरण सुनिश्चित करता येणार असून अपात्र लाभार्थ्यांना मिळणारा गैरफायदा थांबवणे सोपे होणार आहे.

रेशन व्यवस्थेतील गळती रोखण्यास मोठी मदत होणार आहे. तसेच, डिजिटल प्रणालीमुळे लाभार्थ्यांची ओळख पटवणे जलद आणि अचूक होणार असून दुकानदार व ग्राहक दोघांनाही प्रक्रिया अधिक सोपी आणि वेळ बचत करणारी ठरणार आहे. शासनाच्या मते, या बदलामुळे अन्न वितरण व्यवस्थेवर जनतेचा विश्वास अधिक दृढ होणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!