राजू शेट्टी ऍक्टिव्ह मोडवर ; पुण्यापासून बेळगावपर्यंत राष्ट्रीय महामार्गावर टोल वसुलीला कडाडून विरोध

पुणे: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी पुणे -बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर पुण्यापासून कोल्हापूर आणि कागल ते बेळगाव हद्दीत टोल वसूलीला कडाडून विरोध केला आहे. त्यांनी वसुली बंद करण्यासाठी कायदेशीर नोटीस राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला पाठवली आहे. येत्या आठवडाभरात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने याबाबत कार्यवाही न केल्यास पुढील आठवड्यात अवमान याचिका दाखल करणार असल्याचे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.

राज्यभरातील महामार्ग असो वा रस्ते दुरावस्थेचा मनस्ताप प्रत्येकालाच सहन करावा लागतो. तरी देखील आपल्याला टोल हा भरावाच लागतो. मात्र आता यावर सुप्रीम कोर्टानेच एक निर्णय दिला आहे. ज्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. केरळमधील एका प्रकरणावर सुनावणी देताना सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिला आहे. त्यावर आता महाराष्ट्रामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी एनएचआय,राज्य सरकार आणि टोल वसूल करणाऱ्या यंत्रणांना एक नोटीस बजावली आहे. त्यांनी पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर पुण्यापासून कोल्हापूर आणि कागल ते बेळगाव हद्दीतील टोल वसुलीला कडाडून विरोध केला आहे.
याबाबत पुढे बोलताना ते म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार पुणे ते कोल्हापूर व कागल ते बेळगाव या दोन्ही राष्ट्रीय महामार्गावर वाहनधारकाकडून टोल वसुली करता येणार नाही. काल याबाबत मी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांना तातडीने या दोन्ही मार्गावरील टोल बंद करण्यात यावे याबाबत कायदेशीर मार्गाने नोटीस देण्यात आली आहे.
