राज्यात थंडीनंतर आता पाऊसही कोसळणार, ‘या’ भागात पावसाचा इशारा, जाणून घ्या…

rain update : राज्यात सर्वत्र थंडीचा जोर वाढला आहे. बऱ्याचभागातील तापमान ५ अंश सेल्सियसपपर्यंत खाली आलं आहे. असं असताना आता हवामान विभागाने राज्यातील काही भागात पावसाचा इशारा दिला आहे.
येत्या काही दिवसांत थंडीचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या चार दिवसांत राज्याच्या काही भागांत तुरळक पावसाची शक्यता आहे. १९, २० डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि कोल्हापूर घाटमाथा परिसरात तुरळक पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
याशिवाय २० डिसेंबर रोजी सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांत काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे पुणे वेधशाळेने म्हटले आहे.
दरम्यान, पुणे परिसरात पुढील तीन दिवस आकाश निरभ्र राहून धुके पडण्याची शक्यता आहे, तसेच १९, २० डिसेंबरला आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे, असंही हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे.
दरम्यान, राज्यात काही दिवसांपासून थंडीचा जोर चांगलाच वाढला आहे.
उत्तरेकडे थंड वाऱ्याचा जोर वाढल्याने अंदमानातील समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे राज्यात कडाक्याची थंडी पडली आहे. सध्या मुंबई, पुणे, कोकण, विदर्भ, मराठवाडा यांसह ठिकठिकाणी तापमानात घट झाल्याचे पाहायला मिळते आहे.
मुंबईत सध्या तापमान हे २० अंश सेल्सिअसच्या खाली गेले आहे. तर दुसरीकडे विदर्भात सर्वात कमी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. पुण्यातही थंडीचा जोर वाढला असून सोमवारी (ता. १६) ६.१ अंश सेल्सिअस तर शिवाजीनगरमध्ये ७.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. ढगाळ वातावरणामुळे गायब झालेली थंडी पुन्हा वाढण्यास सुरुवात झाली आहे. हवामानशास्त्र विभागाकडून पुढील काही दिवस थंडीचा जोर कायम राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.