Rain Update : राज्यात पुन्हा परतीच्या पावसाचा अंदाज, ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी, जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज…

Rain Update : राज्यात काही ठिकाणी पावसाच्या सरी बरसत आहेत. राज्यात ढगाळ वातावरण आणि कडक ऊन्हाचा तडाखा असे वातावरण निर्माण झाल्याने दिवसभर कमालीचा उकाडा जाणवत आहे. अशातच राज्यात आज आणि उद्या (शनिवार व रविवारी) राज्यातील काही भागांत हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

तसेच परतीचा मान्सून उत्तर भारतातून वेगाने पुढे महाराष्ट्रात आला आहे. पंरतू, तो नंदूरबारमध्येच अडखळला आहे. अरबी समुद्रावर कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे राज्यात ढगाळ वातावरण आणि उकाडा असे वातावरण तयार झाले आहे.

शनिवार आणि रविवारी कोकण, मध्य महाराष्ट्रातील काही भागांत हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढचे तीन दिवस यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. Rain Update

दरम्यान, त्याचबरोबर आजपासून (ता.१२) पुढील ५ दिवस म्हणजे १६ ऑक्टोबरपर्यंत मराठवाडा, खान्देश, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर सोलापूर अशा १८ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील काही दिवस पुन्हा राज्यात पावसाची शक्यता असल्याने शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत.
पुणे शहरात काल (ता.११) रात्री सात वाजण्याच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. गेल्या काही दिवसांमध्ये दुपारी ऊन आणि संध्याकाळी पाऊस असं संमिश्र वातावरण दिसून येत होतं. शुक्रवारी अचानक विजांच्या कडकडाटांसह शहर परिसरात सरी कोसळल्या. राज्यामध्ये एकीकडे परतीच्या पावसाच्या सरी कोसळत आहेत, तर दुसरीकडे ‘ऑक्टोबर हीट’ जाणवत आहे.
