पावसामुळे हाहाकार!! या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर, प्रशासन अलर्ट मोडवर..

पुणे : रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाचा जोर वाढत आहे. हवामान विभागाने आज रायगड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जाहीर केला असून, पुढील काही तासांमध्ये पावसाचा जोर अधिक वाढण्याचा इशाराही दिला आहे. त्यामुळे आज प्रशासनाकडून सर्व शाळांना देखील सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
मुसळधार पावसाच्या धोक्यामुळे रायगड जिल्हा प्रशासनाने खबरदारी म्हणून हा निर्णय घेतला आहे. रायगड जिल्ह्यातील काही भागांमध्ये कालपासून जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दिनांक १९/०६/२०२५ रोजी शैक्षणिक संस्थांना सुट्टी जाहिर करण्यात येत आहे, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.
अलिबाग, रोहा, तळा, महाड आणि पोलादपूर या तालुक्यांतील शाळांना सुट्टी लागू असेल. यामध्ये अंगणवाडी, सरकारी, खाजगी प्राथमिक आणि माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका शाळा, अनुदानित, विनाअनुदानित शाळा, आश्रमशाळा, महाविद्यालये आणि व्यावसायिक प्रशिक्षण केंद्रांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेऊन प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
रायगड जिल्ह्यात कालपासून जोरदार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे कुंडलिका आणि पाताळगंगा नद्या धोक्याच्या पातळीवर पोहोचल्या आहेत. दरम्यान, खेड तालुक्यातील सुसेरी देवसडे ग्रामपंचायतीच्या हद्दीतील देवसडे गावातील स्मशानभूमी पावसामुळे वाहून गेली आहे.
मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर खेड नगरपरिषदेने शहरातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. जोरदार पावसामुळे नद्या इशारा पातळी ओलांडून वाहत आहेत. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, खेड शहरातील नागरिकांसाठी नगरपरिषदेने महत्त्वाचे आवाहन केले आहे. रात्रीपासून पाऊस जोरदार पडत आहे. नारंगी व जगबुडी नद्या इशारा पातळी ओलांडून वाहत आहेत. सर्वांनी सतर्कता बाळगावी. आपले सामान व कुटुंबातील सर्व सदस्यांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे,” असे खेड नगरपरिषद प्रशासनाने म्हटले आहे. नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे.