पुण्यातील’ संयुक्त प्रसाद मित्र मंडळाची ‘ बळीराजाला अनोखी मानवंदना ; विसर्जन मिरवणुकीत कृषी साहित्यापासून साकारला बाप्पा..

पुणे : आज अनंत चतुर्दशी असल्याने राज्यभरात दहा दिवसाच्या गणेश उत्सवाला मोठ्या भक्तिमय वातावरणात निरोप दिला जात आहे. पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक जगप्रसिद्ध आहे. मोठ्या संख्येने भावीक गणरायाची विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी येत असतात.या मिरवणुकीत नेहमीच कलात्मकता आणि सामाजिक संदेशाचा संगम दिसतो. नारायण पेठेमधील ‘संयुक्त प्रसाद मित्र मंडळाने’ यंदा या परंपरेला साजेशी अशी संकल्पना उभी केली. या मंडळाने विसर्जन मिरवणुकीत ‘कृषी गणेश’चा देखावा आणला होता. आपल्या कृतीतून त्यांनी बळीराजाला अनोखी मानवंदना दिली आहे. जी सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

नारायण पेठेतील या मंडळाने कृषी विषयक केलेल्या देखाव्यात शेतीकामाशी संबंधित साहित्याचा वापर करून या देखाव्याची मांडणी करण्यात आली. बैलगाडी, ट्रॅक्टर, विळा, खुरपे, फवारणी यंत्र, बुजगावणे अशा विविध कृषी साहित्यांच्या साहाय्याने गणरायाची प्रतिमा उभारण्यात आली. केवळ मूर्तीच नव्हे, तर संपूर्ण देखावा शेतीच्या साधनसामग्रीवर आधारित असल्याने अनेकांच्या नजरा या देखाव्याकडे वळत आहेत.
त्याचबरोबर या मंडळांनी उपक्रमातून बळीराजाला वंदन केल आहे. शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा, अन्नाची नासाडी थांबवावी आणि कृषी व्यवसायाला सन्मान मिळावा यासाठी ही संकल्पना राबविण्यात आली आहे. यावर्षी कृषी अवजारापासून बापाची प्रतिकृती साकारून शेतकऱ्यांच्या संघर्षाला सलाम केला आहे.
