Pune News : पुण्यात खोकला, ताप, सर्दी वाढली, कफाच्या त्रासाने पुणेकर हैराण, नेमकं काय घडतंय?

Pune News : उन्हाचा चटका, ढगाळ वातावरण तर रात्री थंडी आणि पहाटे धुके असा बदललेल्या हवामानामुळे शहरात सर्दी, ताप, खोकला, कफाच्या त्रासाने पुणेकर हैराण झाले आहे. त्यात डेंग्यूनेही डोके वर काढले असून, रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे.
धूळ, धूर, दिवाळी खरेदीसाठी उडालेली नागरिकांची झुंबड, यानिमित्ताने रस्त्यांवर येणारी हजाराे वाहने यामुळे पुण्यात हवेचे प्रदूषण प्रचंड वाढले आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना सर्दी, पडसे, दमा, डाेळे चुरचुरणे आणि दाेन ते तीन आठवडे चालणाऱ्या खोकल्याने बेजार केले आहे. तसेच वाढलेली थंडी आणि आर्द्रता यामुळे पुण्यासह उपनगरांतील हवेचा दर्जा खालावला आहे. Pune News
सध्या शहरातील हवेचे प्रदूषण वाढले आहे. यामध्ये धूळ, धूर यांचा समावेश आहे. तसेच आता वाहने माेठ्या प्रमाणात बाहेर काढल्याने हवेत पीएम १० आणि पीएम २.५ या सूक्ष्म धूलीकणांचे प्रमाण प्रचंड वाढल्याने पुणेकरांचा दम घुटत आहे. मानवी केस सुमारे १०० मायक्रोमीटर रुंद असतात. त्यामुळे त्याच्या रुंदीवर अंदाजे ४० सूक्ष्म कण बसू शकतात.
काय आहे पीएम २.५ अन् त्याचे दुष्परिणाम काय?
सध्या वातावरणामुळे तापाचे रुग्ण वाढले आहेत. साधरणतः तीन दिवसांपर्यंत ताप राहतो. त्यानंतर चार ते पाच दिवस सर्दी, खोकल्याचा त्रास होतो. काही रुग्णांना तापानंतर दहा दिवसांपर्यंत सर्दी, खोकल्याचा त्रास होत आहे. त्यामुळे काळजी घेणे आवश्यक आहे. पीएम २.५ हा धूलीकण २.५ मायक्रोमीटर व्यासाचा किंवा त्याहून लहान असतो. ताे मानसाच्या केसांच्या व्यासाच्या तुलनेत ३ टक्के इतक्या लहान आकाराचा असतो. ते केवळ सूक्ष्म दर्शकाखाली शोधता येतात.
हे घटक सर्व प्रकारचे ज्वलन, दिवाळी दरम्यान फटाके, कचरा जाळणे, मोटार वाहने, पॉवर प्लांट, लाकूड जाळणे, जंगलातील आग, शेती जाळणे आणि काही औद्योगिक प्रक्रियांमधून तयार होते. हे सूक्ष्म धूलीकण श्वसन मार्गाद्वारे फुप्फुसांमध्ये जातात. फुफ्फुसे ते काढून टाकू शकत नाहीत. तसेच त्यांना शरीर अडथळा करू शकत नाही. इतकेच नव्हे, तर श्वास घेतल्यावर आपल्या फुफ्फुसांद्वारे रक्तप्रवाहात हे कण नेले जातात आणि पुढे रक्तापासून आपल्या शरीराच्या काही भागांमध्ये, अवयवांमध्ये जातात.
ही घ्या काळजी..
फार वेळ बाहेर काम किंवा परिश्रम करू नये.
धूळयुक्त वातावरणात जाऊ नये.
वेळेवर जेवण करावेत, आजारी लाेकांनी वेळेवर औषधे घ्यावीत, चांगला व प्रथिनेयुक्त आहार घ्यावा.
आजारी असलेल्या व्यक्तींनी बाहेर पडू नये.
बाहेर पडायचे झाल्यास मास्क लावावा.