Pune : ड्रोनमुळे खरंच चोरी होतेय? ग्रामीण भागात बनलाय चिंतेचा विषय, नेमकं प्रकरण काय?

Pune : हवेत उडणारे ड्रोन लोकांच्या काळजीचा विषय बनले आहेत आणि हळूहळू आता तर ते चिंतेचा विषय बनू लागले आहेत. कारण पुणे जिल्ह्यात तर अधिकच चिंतेचा विषय बनला आहे. सामाजिक स्वास्थ या तथाकथित ड्रोनमुळे बिघडू लागले आहे.
अनेक गावांमध्ये रात्रीच्या वेळी लोक जागे राहत आहेत आणि आता गेल्या काही दिवसापासून गावामध्ये येणारी तिऱ्हाईत माणसं किंवा माळरानावरती गप्पा मारायला बसलेली मंडळी दिसली की, त्यांना आता पकडून मारण्याचे काम सुरू झाले आहे. या साऱ्या घटनांमध्ये ड्रोनचे प्रकरण आता गंभीर बनू लागले आहे.
गेल्या काही महिन्यांपासून ग्रामीण भागामध्ये रात्रीच्या वेळी ड्रोन उडतात आणि हे ड्रोन आपली हेरगिरी करत आहेत. आपल्या शेतातील पिकांची हेरगिरी करत आहेत, वाड्यावस्त्यांवरील घरांची हेरगिरी करत आहेत आणि चोऱ्यांचे प्रकार घडत आहेत, अशा प्रकारच्या अफवा आणि चर्चा सुरू झाल्या आहेत.
वस्तुतः गेल्या दोन तीन महिन्यांमध्ये बारामती परिसरात असलेल्या विमान प्रशिक्षित कंपन्या रात्रीच्या वेळी त्यांची विमाने उड्डाण करतात अशी माहिती देत आहेत आणि त्यामुळे पोलीस देखील ही सर्व रात्रीच्या वेळी उडणारी तथाकथित ड्रोन हे विमाने असल्याचा निर्वाळा देत आहेत. खरंतर विमान कंपनीच्या प्रशिक्षकांनी आमची विमाने नेमकी कोणत्या कोणत्या भागात आहेत, कोणत्या कोणत्या दिवशी कुठे कुठे फिरली? याची एकदा माहिती देण्याची गरज आहे.
त्यांचे म्हणणे खरेच आहे, परंतु याला आणखी एक किनार आहे. एरवी लग्न समारंभापासून ते राजकीय कार्यक्रमापर्यंत सभांपर्यंत ड्रोन पूर्ण माहिती असलेली लोकं विमान आणि ड्रोन यामधील फरक आम्हाला समजत नाही का? असा सवाल करू लागले आहेत.
या सर्व लोकांचे म्हणणे असे आहे की, बारामती परिसरातील छोटी विमाने, हलकी विमाने जेव्हा उड्डाण करतात, तेव्हा ती कितीही उंचीवर असली तर त्यांचा आवाज येतो. मात्र आता उडणारे जे आहे, त्याचा कसलाही आवाज येत नाही, त्यामुळे ही विमाने नाहीत तर हे ड्रोनच आहेत असा समज या लोकांचा आहे.
आता गावागावात ड्रोनची ही चर्चा जोर धरू लागली आहे. रात्रीच्या वेळी लोक जागे राहू लागले आहेत आणि ड्रोन उडवणारे लोक हे चोर आहेत असा त्यांचा पक्का समज होऊ लागला आहे. सार्वत्रिक सामाजिक चिंतेची स्थिती लक्षात घेत आता यात लोकप्रतिनिधींनी देखील उडी घेतली आहे. खासदार सुप्रिया सुळे असतील, उपमुख्यमंत्री अजित पवार असतील, त्यांनी देखील या ड्रोन संदर्भात खातरजमा करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. Pune
यातील महत्त्वाचा मुद्दा हा आहे की, दोन दिवसांपूर्वीच बारामतीतील जळगाव कडेपठार येथे पुण्यावरून आलेल्या दोघा जणांना, ते ड्रोन उडवणारे असल्याचे समजून लोकांनी मारहाण केली, तर नगरहून पाहुणे बनून बारामती तालुक्यातील जिरायती गावात निघालेल्या दोघाजणांचा एका गावातील ग्रामस्थांनी पाठलाग केला.
या लोकांना हे दोघेजण एवढे घाबरले की, त्यांनी त्यांची दुचाकी आणखी वेगात चालवली. त्यांनी दुचाकी वेगात चालवल्याने लोकांचा संशय आणखी पक्का झाला आणि ते आणखी दुप्पट वेगाने त्यांच्या पाठलाग करू लागले. अखेर या भागात नोकरी असलेल्या नगरकरच्या दोघांना रस्ता नीट समजला नाही आणि त्यांची दुचाकी एका नाल्यात पडली.
दरम्यानच्या काळात हे दोघेजण मद्यप्राशन केलेले असल्याने साहजिकच लोकांनी त्यांना बेदम चोप दिला. त्यांच्याकडून संदिग्ध उत्तरे मिळू लागल्याने लोकांचा संशय आणखी बळावतो. मात्र सध्या माळरानांवर किंवा निर्जन ठिकाणी दारूच्या पार्ट्या करणारे ड्रोन उडवणारेच आहेत असे समजून त्यांना मारहाण करण्यास सुरुवात झाली आहे.
दरम्यान, हा प्रकार येत्या काही दिवसांमध्ये मॉब लिंचिंग मध्ये परावर्तित होऊ शकतो. लोकांची भीती, लोकांची वाढणारी चिंता आणि त्यातून वाढणारा राग हा कोणाच्या तरी मृत्यूस कारणीभूत ठरू शकतो, याची गंभीर दखल घेऊन पोलिसांनी यामध्ये इतर कोणत्याही गोष्टींपेक्षा अधिक हस्तक्षेप करायला हवा.