दिल्ली स्फोटावर पंतप्रधान मोदींची भूतानमधून पहिली प्रतिक्रिया; थेट इशारा देताना म्हणाले की, षडयंत्र रचणाऱ्यांना…

नवी दिल्ली : दिल्लीत काल झालेल्या स्फोटावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिक्रिया आली आहे. दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ सोमवारी संध्याकाळी 6:52 च्या सुमारास शक्तीशाली कार स्फोट झाला. दिल्ली पोलिस, स्पेशल सेल आणि एनएसजीच्या टीम्स अलर्ट मोडवर आहेत.

त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आजपासून दोन दिवस भूतानच्या दौऱ्यावर आहेत, या दौऱ्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या स्फोटाबाबत भाष्य केलं. या षडयंत्रामागे जे कोणी आहेत, त्यांच्याविरोधात कठोर पावलं उचलली जातील,षडयंत्र रचणाऱ्यांना सोडलं जाणार नाही, आमच्या एजन्सी या घटनेच्या मुळाशी जातील आणि जे कोणी यामध्ये सहभागी आहेत, त्यांना धडा शिकवला जाईल असं पंतप्रधान भूतानमध्ये म्हणाले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूतान दौऱ्यादरम्यान दिल्लीतील भीषण घटनेबद्दल गहिवरलेल्या शब्दांत शोक व्यक्त केला आणि पीडित कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केली. त्यांनी म्हटलं की, मी अत्यंत दुःखी मनाने भूतानमध्ये आलो आहे. १० नोव्हेंबरच्या संध्याकाळी घडलेल्या या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे.” पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, ते संपूर्ण रात्रभर तपास यंत्रणांशी संपर्कात होते आणि आवश्यक ते सर्व निर्देश दिले.

त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, या कटकारस्थानाच्या मुळापर्यंत जाण्यासाठी सर्व एजन्सी तपास करत आहेत, आणि दोषींना अजिबात सोडले जाणार नाही. ज्या कुटुंबांनी या घटनेत आपले प्रियजन गमावले आहेत, त्या प्रत्येक कुटुंबाच्या दुःखात संपूर्ण देश सहभागी आहे.
त्यांनी शोकाकुल परिवारांना धीर दिला आणि जखमींच्या लवकर बरे होण्याची प्रार्थना केली. यासोबतच, पंतप्रधानांनी सुरक्षा आणि कायदा अंमलबजावणी यंत्रणांना त्वरित आणि निष्पक्ष तपास करून आरोपींपर्यंत पोहोचण्याचे तसेच दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपला नियोजित दौरा कायम ठेवलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या भूतान दौऱ्यावर आहेत. हा त्यांचा भूतानचा चौथा दौरा असून, या भेटीचा मुख्य उद्देश भारत आणि भूतान यांच्यातील मैत्री व भागीदारी अधिक दृढ करणे हा आहे. दरम्यान, एकीकडे दिल्ली बॉम्बस्फोटाने हादरली असतानाच पीएम मोदी भूतान दौऱ्यावर गेल्याने विरोधकांनी त्यांच्या जोरदार हल्लाबोल केला आहे.