पार्थ पवारांची खासदारकी धोक्यात? सुनेत्रा पवार आयोगाला लिहिलेलं पत्र मागे घेणार? महत्वाची माहिती समोर..

पुणे : महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सर्वकाही अलबेल नसल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी पक्ष बळकवण्याचा प्रयत्न केला, असं म्हटलं जात होतं. या दोन नेत्यांना शह देण्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं. आता सुपुत्र पार्थ पवारांची खासदारकी टिकवण्यासाठी हे पत्र त्या मागे घेणार असल्याची चर्चा होती. मात्र पवारांकडून हे पत्र मागे घेतलं जाणार नसल्याची माहिती समोर आली आहे.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात ‘ In this regard ‘ असा उल्लेख केला आहे. याचा अर्थ पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी आणि राष्ट्रीय अधिवेशन संदर्भातील पत्रव्यवहार ग्राह्य धरू नये, असा अर्थ होतो. या पत्रामुळे पार्थ पवार यांच्या खासदारकीत अडचण निर्माण होणार असल्याची चर्चा सुरू झाली होती.
मात्र पार्थ पवार यांच्या राज्यसभा निवडीसाठी झालेला पत्रव्यवहार राज्यसभा निवडणूक अधिकाऱ्यासोबत झालेला आहे. निवडणूक आयोगासोबत नाही. त्यामुळे त्यांच्या खासदारकीत कोणती अडचण येणार नसल्याचं पक्षाच्या वर्तुळातून सांगितलं गेलं आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला दिलेलं पत्र मागे घेतलं जाणार नाही.

दरम्यानच्या काळात पक्षातील ज्येष्ठ नेते तटकरे आणि पटेल यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून राष्ट्रवादी काँग्रेसच्या संविधानात काही बदल झाल्याचं सांगितलं होतं. राष्ट्रवादीच्या अध्यक्षांएवढेच अधिकार कार्याध्यक्षांना (प्रफुल्ल पटेल) आहेत, असा उल्लेख त्या पत्रात करण्यात आला. त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी देखील निवडणूक आयोगाला पत्र लिहून हा असे ग्राह्य धरू नये असं सांगितलं होतं. या पत्रामुळे राष्ट्रवादीत नव वादंग निर्माण झाल्याच्या चर्चांना जोर आला होता.