संसदेच्या पावसाळी अधिवेशनाची तारीख जाहीर! ऑपरेशन सिंदूरवर होणार का चर्चा?

नवी दिल्ली : पहलगामचा हल्ला झाल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानला तसेच तेथे पोसला जात असलेल्या दहशतवादाला जशास तसे उत्तर दिले. मात्र सरकारने या प्रकरणी विरोधकांना विश्वासात घ्यावे.
तसेच या मोहिमेमुळे नेमकं काय साध्य झालं, हे सरकारने स्पष्ट करावे. केंद्र सरकारने विशेष अधिवेशन घेऊन याबाबत चर्चा घडवून आणावी, अशी मागणी केली आहे. असे असतानाच सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने आता पावसाळी अधिवेशनाच्या तारखा जाहीर केल्या आहेत.
२१ जुलै २०२५ पासून १२ ऑगस्ट २०२५ पर्यंत हे अधिवेशन पार पडणार आहे. केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी याबाबत अधिकृत घोषणा केली असून, या अधिवेशनात ‘ऑपरेशन सिंदूर’ वर खास चर्चा होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
सत्ताधारी भाजपने ही मागणी फेटाळली असून, ‘ऑपरेशन सिंदूर’वर चर्चेसाठी स्वतंत्र अधिवेशन घेण्याची गरज नसल्याचे स्पष्ट केले आहे. पावसाळी अधिवेशनातच यावर शासकीय नियमांतर्गत सविस्तर चर्चा घडवून आणली जाईल, असे रिजिजूंनी सांगितले.
या वर्षातले हे दुसरे अधिवेशन आहे. याआधी 31 जानेवारी रोजी संसद अधिवेशन सुरू झाले होते, जे 4 एप्रिल रोजी स्थगित करण्यात आले होते. तीन महिन्यांच्या खंडानंतर आता पुन्हा अधिवेशन सुरू होत असून, याकडे देशभराचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, ‘ऑपरेशन सिंदूर’च्या मुद्द्यावर संसदेत चर्चा झालीच पाहिजे, असा विरोधकांचा दबाव कायम आहे. १६ पक्षांनी एकत्र येत पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र दिलं होतं, मात्र विशेष सत्राऐवजी यावर पावसाळी अधिवेशनातच चर्चा होईल, असा निर्णय घेण्यात आला आहे.