पालकांनो लक्ष द्या! राज्यभरात बस चालकांचा बेमुदत संप, २ जुलैपासून धावणार नाही एकही बस, काय आहेत मागण्या?

पुणे : राज्यभरातील स्कूल बस मालकांनी अनिश्चित काळासाठी संपावर जाण्याची घोषणा केली आहे. राज्यातील शाळकरी मुलांच्या दैनंदिन प्रवासावर मोठा परिणाम होणार आहे. महाराष्ट्र स्कूल बस ओनर्स असोसिएशनने २ जुलै २०२५ पासून बेमुदत संपावर जाण्याची घोषणा केली आहे.
त्यामुळे शाळांना जाण्यासाठी स्कूल बसवर अवलंबून असलेल्या हजारो विद्यार्थ्यांच्या वाहतुकीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. या संपामागील मुख्य कारण म्हणजे वाहतूक पोलीस आणि सीसीटीव्ही यंत्रणेमार्फत स्कूल बस चालकांवर मोठ्या प्रमाणावर ई-चलनाद्वारे दंड लावला जात असल्याचा आरोप.
संघटनेचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी सांगितले की, आम्ही विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळेच्या गेटपाशी थांबतो, मात्र आम्हालाच त्यासाठी दंडित केलं जात आहे. स्कूल बस चालकांच्या म्हणण्यानुसार, शाळांसमोर योग्य पिकअप आणि ड्रॉप झोन नसल्यामुळे त्यांना रस्त्यावर थांबावे लागते.
त्याचवेळी, वाहतूक पोलीस त्या क्षणिक थांब्यावरही ई-चलन पाठवत असल्याचा आरोप आहे. अनेक वेळा एकाच बसला एका दिवसात अनेक दंड आकारले जात असल्यामुळे आर्थिक संकट उभं राहतं आहे.
या पार्श्वभूमीवर सरकारने चौकशीसाठी समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव दिला असला, तरी बस मालकांचा आग्रह आहे की तात्काळ काही अंतरिम निर्णय घ्यावेत. कारण नवीन शैक्षणिक सत्र सुरु झाल्यामुळे बससेवा बंद केल्यास पालक व विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास होईल.
संघटनेने सरकारसमोर तीन प्रमुख मागण्या मांडल्या आहेत: शाळांसमोरील थांब्यांसाठी दिलेले प्रलंबित ई-चलन माफ करावेत, योग्य झोन निश्चित होईपर्यंत नवीन ई-चलनावर स्थगिती आणावी आणि सरकार, पोलीस, RTO व संघटनांसह संयुक्त टास्क फोर्स तयार करावी.
दरम्यान, संघटनेने शाळा प्रशासन आणि पालकांना देखील आवाहन केलं आहे की त्यांनी तात्पुरते ऑनलाईन वर्गांचा पर्याय विचारात घ्यावा किंवा वेळापत्रक बदलावे. पालकांनी देखील पर्यायी प्रवासाची व्यवस्था करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.
फक्त स्कूल बसच नव्हे, तर राज्यभरातील अनेक खाजगी बस व ट्रक चालक संघटनांनीही या संपाला पाठिंबा दर्शविला आहे. जर यावर तोडगा निघाला नाही, तर संपूर्ण सार्वजनिक आणि मालवाहतूक सेवा ठप्प होण्याचा धोका आहे.