राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या अस्थिविसर्जन स्थळी भवरापूर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन…!

उरुळी कांचन : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या अस्थिविसर्जित झालेल्या पवित्र भवरापूर (ता.हवेली ) येथील मुळा मुठा नदी तिरावर भवरापूर ग्रामस्थ व पद्मश्री डॉ.मणिभाई देसाई महाविद्यालय , उरुळी कांचन यांच्या संयुक्त वतीने अस्थिविसर्जणाच्या पुण्यस्मरणीय दिनी भजन, किर्तन, शांती उपदेश कार्यक्रमांचे आयोजन करुन राष्ट्रपित्यांना आदरांजली वाहण्यात आली.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या उरुळी कांचन भूमीत महात्मा गांधी यांच्या अस्थि विसर्जित करण्याचे महान कार्य त्यांचे शिष्य पद्मश्री डॉ.मणिभाई देसाई यांनी केले होते.१२ फेब्रुवारी १९४८ साली महात्मा गांधी यांच्या अस्थि भवरापूर येथील मुळामुठा नदी तिरावर विसर्जित करण्यात आल्या होत्या. तेव्हापासून भवरापूर ग्रामस्थांच्या वतीने भवरापूर येथील पवित्र स्थळी १२ फेब्रुवारी या पुण्यस्मरणीय दिनी भजन, किर्तन कार्यक्रमांचे आयोजन करुन महात्मा गांधी यांना आदरांजली वाहण्यात येत असल्याची परंपरा चालू आहे. याच परंपरेनुसार सोमवार (दि.१३ ) महात्मा गांधी यांना आदरांजली वाहण्यात आली.यावेळी ग्रामस्थांच्या वतीने पुण्यस्मरणीय दिनी अन्नदानाचा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमास भवरापूर चे सरपंच सचिन सातव,हवेली पंचायत समितीचे माजी सदस्य सुभाष जगताप, धनंजय साठे, हेमलता बडेकर, ज्येष्ठ नेते माऊली कांचन, राष्ट्रवादी चे प्रवक्ते विकास लवांडे,उरुळी कांचनचे सरपंच राजेंद्र कांचन आदी मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या अस्थी विसर्जित स्थळी महात्मा गांधी व दिवंगत पद्मश्री डॉ. मणिभाई देसाई यांचे स्मारक येथे बांधण्याचा संकल्प ग्रामपंचायत भवरापूर यांनी केला असुन त्यासाठी महात्मा गांधी निसर्गोपचार आश्रम संस्थेची विसर्जन स्थळी जागा ही भवरापूर ग्रामपंचायतीच्या नावे हस्तांतरीत करण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती सरपंच सचिन सातव यांनी दिली.