घराबाहेर पडण्यापूर्वी सावधान! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी, जाणून घ्या…

पुणे : राज्यात आज पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे. तसेच याच पार्श्वभूमीवर आता मुसळधार हजेरी लावण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विशेषतः कोकण आणि घाटमाथा भागात हवामान विभागाने रेड अलर्ट जाहीर केला आहे.

मुंबई, ठाणे आणि पालघरसह काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे आणि चक्रीवादळाच्या अवशेषांमुळे हवामानात मोठे बदल होत आहेत. परिणामी, राज्यातील अनेक भागांमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.
कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. या भागांमध्ये पुढील २४ तासांत अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर मुंबई, ठाणे, पालघर येथे जोरदार पावसाचा अंदाज असून, या भागांना ऑरेंज अलर्ट दिला आहे.

कोकण किनारपट्टीवरील गावांमध्ये सध्या वातावरण पावसाला पूरक आहे. बुधवारनंतर सरी-वरसार स्वरूपाचा पाऊस थोडक्यात उसंत घेत असल्याचे चित्र आहे, मात्र हवामान विभागाचा अंदाज गंभीर आहे.
दरम्यान, पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर देखील रेड अलर्ट देण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे या भागांमध्ये भूस्खलनाचा धोका निर्माण होऊ शकतो. विशेषतः दऱ्या खोऱ्यातील ग्रामीण भागांमध्ये नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नाशिक घाटमाथा परिसरात देखील पावसाची तीव्रता वाढू शकते, म्हणून या ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोलीसह विदर्भातील जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय बुलडाणा, अमरावती, वाशीम, नागपूर, यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये विजांसह पावसाचा इशारा आहे. त्यामुळे या भागांतील नागरिकांनी घराबाहेर पडताना खबरदारी घ्यावी, तसेच ओले विजेचे उपकरणे टाळावीत.