बळीराजाला मोठा दिलासा! आता घरबसल्या मिळवा दोन लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज; केंद्र सरकारने सुरु केले ‘हे’ नवे पोर्टल..

नवी दिल्ली : पीक कर्जासाठी बँकांच्या फेऱ्या मारण्याची गरज भासणार नाही. शासनाच्या पुढाकाराने आणि रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार शेतकऱ्यांना आता घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने पीक कर्जासाठी अर्ज करता येणार आहे.
विशेष म्हणजे, अर्ज मंजूर झाल्यास अवघ्या दोन दिवसांत कर्जाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. आतापर्यंत पीक कर्जासाठी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर कागदपत्रांची पूर्तता करावी लागत होती.
तसेच यामुळे वेळ, पैसा आणि मानसिक ताण वाढत होता. मात्र, या नव्या ऑनलाइन व्यवस्थेमुळे संपूर्ण कर्जप्रक्रिया अधिक सुलभ, जलद आणि पारदर्शक होणार असल्याचे सांगितले जात आहे.

राज्यातील शेतकरी आता www.jansamarth.in या जनसमर्थ पोर्टलच्या माध्यमातून थेट पीक कर्जासाठी अर्ज करू शकणार आहेत. शेताच्या बांधावर बसूनही मोबाईल किंवा संगणकाच्या साहाय्याने अर्ज सादर करता येणार असून, सर्व कागदपत्रे योग्य असल्यास फक्त दोन दिवसांत कर्जाची रक्कम खात्यात जमा होणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

ही सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी रिझर्व बँक ऑफ इंडियाने आधीच मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. त्यानुसार जनसमर्थ पोर्टलचा वापर करून आता किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत पीक कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
दरम्यान, घरबसल्या पीक कर्जासाठी अर्ज करण्याची ही योजना सध्या प्रायोगिक (पायलट प्रोजेक्ट) स्वरूपात राबवली जात असून, यासाठी सोलापूर जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे. सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी या नव्या उपक्रमाची माहिती दिली आहे. या ऑनलाइन प्रणालीमुळे शेतकऱ्यांना बँकांमध्ये रांगा लावण्याची गरज राहणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत या पोर्टलवरून २ लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज मिळू शकणार आहे. अर्जासाठी शेतकऱ्यांकडे (शेतकरी ओळख क्रमांक) असणे बंधनकारक आहे. तसेच आधारकार्ड, आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर, बँक पासबुक आणि पॅनकार्ड (असल्यास) ही आवश्यक कागदपत्रे असतील.
