शेतकरी नाही शासनच भिकारी! कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा नको तेच बोलले, सुप्रिया सुळेंनी केली थेट केंद्राकडे राजीनाम्याची मागणी..

मुंबई : काही दिवसांपूर्वी आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांचा विधिमंडळात रमी खेळतानाचा व्हिडीओ शेअर केला होता. यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. यामुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. असे असताना अजून एक बेताल वक्तव्य त्यांनी केले आहे.

शेतकरी नाही शासनच भिकारी आहे, असे वक्तव्य त्यांनी केल्याने वाद पेटला आहे. याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला आहे. त्या म्हणाल्या, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात १०५ हुतात्म्यांच्या बलिदानातून साकारलेल्या महाराष्ट्राचा मंगलकलश स्व यशवंतराव चव्हाण साहेब यांनी आणला. त्यानंतर आलेल्या शासनकर्त्यांनी आणि राज्यातील जनतेने कठोर परिश्रम करुन हा महाराष्ट्र देशातील सर्वात संपन्न असे राज्य बनविले.
त्या राज्याला ‘भिकारी’ म्हणणे हा असंवेदनशीलतेचा कहर आहे. हा राज्याचे आतापर्यंतचे मुख्यमंत्री आणि राज्यातील जनतेच्या परिश्रमाचा अपमान आहे. हा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही. एकतर शेतकऱ्यांचे एवढे ज्वलंत प्रश्न उभे असताना शेतकऱ्यांच्या प्रती अतिशय असंवेदनशील वागणारे कृषीमंत्री या राज्याने कधीही पाहिले नव्हते.

त्यात सभागृहात मोबाईलवर रमी खेळून या सगळ्यांवर त्यांनी कडी केली आहे. आजच्या पत्रकार परिषदेत ते पश्चात्ताप व्यक्त करुन राजीनामा देतील अशी अपेक्षा होती. त्यापेक्षा त्यांनी राज्यालाच ‘भिकारी’ म्हणून कळस गाठला आहे. आम्ही त्यांचा निषेध करतो आणि मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो की विद्यमान कृषीमंत्री महोदयांचा राजीनामा घ्यावा
तसेच हे खाते शेती आणि शेतकरी यांच्याप्रती संवेदनशीलतेने वागणाऱ्या व्यक्तीकडे द्या.अशी मागणी त्यांनी केली आहे. याबाबत आज दिल्लीत महाविकास आघाडीच्या खासदारांनी केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांची भेट घेतली. त्यांनी याबाबत त्यांच्याकडे राजीनाम्याची मागणी केली आहे. यामुळे आता राजीनामा कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.